बेंगळूर : प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सोमवारी धर्मांतराला मूक आक्रमण म्हणत नागरिकांनी समाजात धर्मांतराचा धोका वाढू देऊ नये असे वक्तव्य केले.
“हिंदूंवर वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर धर्मांतरे घडवून आणली गेली. इतर धर्माचे लोक पाहिले तर ते मूळचे हिंदूच आहेत. भौगोलिक आक्रमणासोबतच देशात धार्मिक आक्रमणे होत आहेत. भौगोलिक आक्रमणे उघडपणे घडते पण धार्मिक आक्रमण हळूहळू होते,” असे विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोम्माई म्हणाले.
विहिंप आणि बजरंग दलाच्या बॅनरखाली विविध मठांच्या प्रमुखांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मांतर विधेयकाला सर्व स्तरातून होत असलेला विरोध तसेच काही मिशनरी संघटनांनी हे विधेयक संविधानाच्या विरोधात असल्याचे सांगून घेतलेल्या भुमिकेमुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.