बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकच्या काही भागात पावसाने हजेरी लावली परंतु गुरुवारी गुलबर्गा जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या, विशेषतः भीमा नदीच्या काठावर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत असून नद्यांच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे. पाण्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान रायचूर जिल्ह्यातील अलमट्टी आणि नारायणपूर धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरणातून सतत पाणी सोडले जात आहे. गुरुवारी सकाळी नारायणपूर धरणातून १ लाख ६१ हजार क्युसेक तर अलमट्टी धरणातून ७० हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. कृष्णा आणि भीमा नद्यांच्या पाणी पातळीत भर पडली आहे. रायचूर जिल्ह्यातील लिंगगुरु, देवदुर्गा आणि रायचूर तहसीलमधील अनेक खेड्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती निवार केंद्राने दिलेल्या माहितीनुसार कोप्पळ जिल्ह्यात २ हजार २७५ हेक्टर क्षेत्रातील पिके नष्ट झाली आहेत. कापूस, मका आणि भात पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेळगाव, विजयपूर, बागलकोट, गुलबर्गा, बिदर, यादगिर, रायचूर आणि कोप्पळ जिल्ह्यात हजाराहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.
सेडम तहसीलच्या मुळखेड येथील मोरारजी देसाई निवासी शाळेत अडकलेल्या सहा कर्मचाऱ्यांना एनडीआरएफच्या जवानांनी वाचवले आहे.
महाराष्ट्रातील उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे अफजलपूर, जेवारगी आणि चित्तपूर तहसीलमधील अनेक गावात पाणी घुसल्याने ग्रामस्थांना गाव सोडण्यास भाग पाडले आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने या ग्रामस्थांना इशारा दिला होता. उत्तरा कन्नड जिल्ह्यातील कारवार येथे अवघ्या तीन तासांत ८२ मिमी पावसाची नोंद झाली.
दक्षिण कन्नड आणि उडुपी या जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस पडत आहे. ज्यामुळे शेतात उभी असलेली पिके बुडाली आहेत. सुपारी व रबराच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि महसूलमंत्री आर. अशोक यांनी शुक्रवारी कल्याण-कर्नाटक, उत्तर-कर्नाटक आणि किनारी कर्नाटकातील ११ जिल्ह्यांच्या जिल्हा उपायुक्तांसह व्हिडिओ कॉन्फरन्स घेत जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.