प्रतिनिधी/ पणजी
अपेक्षेनुसार सरकारने राज्यात लागू असलेल्या कर्फ्यूच्या कालावधीत आणखी 7 दिवसांची वाढ जाहीर केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी त्यासंदर्भातील घोषणा केली. त्यानुसार आता दि. 7 जूनपर्यंत राज्यात कर्फ्यू लागू राहणार आहे.
राज्यात 9 मे पासून कर्फ्यू लागू करण्यात आला असला तरीही कोरोनाचा कहर नियंत्रणात आणण्यात सरकारला समाधानकारक यश मिळालेले नाही. अनेक भागात अद्याप कोरोनाबाधित मोठय़ा संख्येने सापडत आहेत. खास करून किनारपट्टी भागात हे चित्र दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर दि. 31 मे रोजी संपुष्टात येणारा कर्फ्यू पुढील संसर्ग रोखण्यात पुरेसा ठरणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे सरकारने त्याचा कालावधी आणखी एका आठवडय़ाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
वाढत्या कोरोनाच्या कहरात रोज 50 ते 75 जणांचे बळी जाऊ लागल्यामुळे अखेरीस सरकारने 9 मे पासून 15 दिवसांसाठी राज्यात कर्फ्यू लागू केला होता. त्याही कालावधीत कोरोना नियंत्रणात येत नाही, असे दिसून आल्यामुळे त्यात 7 दिवसांची (30 मे पर्यंत) वाढ जाहीर करण्यात आली. आता दुसऱयांदा त्यात आणखी 7 दिवसांची वाढ करत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनास्थिती लक्षात घेता कर्फ्यू कालावधी वाढणार याचा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला होता. त्यासंबंधी पत्रकारांनीही मुख्यमंत्र्यांकडे अनेकदा विचारणा केली होती. त्यावेळी शनिवारपर्यंत आपण काय तो निर्णय कळविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. त्यानुसार शनिवारी त्यांनी वाढीव कर्फ्यूची घोषणा केली आहे.
पॅसिनो कंपनीने फोडले बिंग
केंद्र सरकारने कोविडसंबंधी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने गोव्यात पुढील 15 दिवसांसाठी कर्फ्यू कालावधी वाढविण्याचा सरकारचा विचार होता. परंतु पणजीतील डेल्टा कॉर्प लि. या बडय़ा पॅसिनो कंपनीने सरकारचे ते बिंग फोडले. सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याच्या दोन दिवस आधीच त्यांनी मुंबई स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज यांना पत्र लिहून गोव्यात ‘लॉकडाऊन’ (कर्फ्यू हा शब्द वापरलेला नाही) कालावधी 15 जूनपर्यंत वाढविण्यात आल्याचे कळविले. या लॉकडाऊनमुळे पॅसिनो उद्योग बंद राहणार असल्याचे दोन्ही संस्थांना कळविण्याचा सदर कंपनीचा उद्देश होता.
परंतु सदर पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. सरकारने कर्फ्यू वाढविण्यासंबंधी कोणतीही घोषणा केलेली नाही, तरीही सदर कंपनीला आगाऊ माहिती कशी मिळाली? यावरून सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली. राज्य सरकार आपला कोणताही निर्णय आधी पॅसिनो कंपन्यांना कळविते व नंतर जनतेसाठी जाहीर करते का? किंवा पॅसिनो कंपन्यांच्या संमती, आदेशानुसारच सरकार निर्णय घेते का? असे सवालही उपस्थित करण्यात येऊ लागले.
अशाप्रकारे व्हायरल झालेले सदर पत्र सरकारच्या बरेच वर्मी लागले. त्यामुळे सदर कंपनीवर दबाव आणून ते मागे घेण्यास भाग पाडण्यात आले. बहुदा त्यामुळेच सरकारने कर्फ्यू कालावधी थेट 15 दिवसांसाठी न वाढवता 7 दिवसांसाठीच वाढविला असावा, अशी जोरदार चर्चाही शनिवारी सायंकाळी सर्वत्र होती.