काहींना ताप येत असल्याने विक्रेत्यांचा निर्णय
प्रतिनिधी/ म्हापसा
कळंगुट मार्केटमधील काहीजणांना ताप आल्याचे आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस मासळी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून मार्केट मासळी विक्रेत्यांनी स्वतःहून बंद ठेवले आहे, अशी माहिती सरपंच फ्रान्सिस रॉड्रिग्ज यांनी दिली आहे.
बागा येथील काही मासळी विक्रेते कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्या बाधित विक्रेत्यांचा म्हापसा मार्केटशी संपर्क होता तसेच त्यांच्या कुटुंबातील काहीजण कळंगुट मार्केटमध्येही येत होते. या पार्श्वभूमीवर कळंगुट मासळी मार्केटमधील काहीजणांना ताप येत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विक्रेत्यांनी पुढील तीन दिवस मासळी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान मार्केटमध्ये अद्याप कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती फ्रान्सिस रॉड्रिग्ज यांनी दिली आहे.
दरम्यान, या बंदबाबत कळंगुट येथील काही मासळी विक्रेत्यांनी सांगितले की, आम्हाला अचानकच आमची दुकाने बंद ठेवण्यास भाग पाडण्यात आले. काही विक्रेते दर दिवशी 30 ते 35 हजारांची मासळी विक्रीसाठी आणतात. त्यामुळे आमचे बरेच नुकसान होणार आहे. याबाबत आम्ही कोणाकडे दाद मागायची अशी विचारणा करत म्हापशात कोरोनाचे रुग्ण सापडेल असताना कळंगुट मार्केट बंद का ? असा प्रश्न काही विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाबाबत अफवा पसरवू नका : सरपंच रॉड्रिग्ज
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. मासळी विक्रेत्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वतःहून मार्केट बंद ठेवले आहे. याबाबत विक्रेत्यांनी पंचायतीला माहिती दिली आहे. त्याचबरोबर इतर काही विक्रेत्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवणार असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती सरपंच फ्रान्सिस रॉड्रिग्ज यांनी सांगितले.