प्रतिनिधी/ बेळगाव
सत्तेचे लावून नाल,
घोडय़ावरून करत आले सैनिक चाल,
दरडावू लागले लोकांना,
तेल लावून बंदुकीच्या टोकांना,
ही खदखद आहे एका कवीच्या मनातील. साहित्याचा जागर सुरू असतानाही त्यावर अनेक निर्बंध लादले जातात. माणसाला समृद्ध करणारे संस्कार, संस्कृती ही साहित्यातून एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे जाते, परंतु जेव्हा साहित्याला जखडून ठेवले जाते त्यावेळी साहित्य कला सर्वात जास्त दु:खी होते. ही खदखद कवी शिवाजी शिंदे यांनी आपल्या कवितेतून मांडली.
36 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱया सत्रात कवी संमेलन सादर करण्यात आले. या कवी संमेलनात अनेक नवोदित कविंनी आपल्या कवितांच्या माध्यमातून समाजात सुरू असणाऱया घडामोडींवर भाष्य केले. प्रारंभी कडोली येथील कवी मोहन पाटील यांनी कोरोनाच्या हाहाकारावर कविता सादर केली.
स्मिता किल्लेकर यांनी ओवीतून समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. भरत गावडे यांनी कोरोना, रोशनी हुंदरे यांनी जात, विश्वनाथ मुरगोडी यांनी नवीन महामारी, यशोदा सौंदलगेकर यांनी कोरोना, मनीषा नाडगौडा यांनी लढवय्या, संदीप मुतगेकर यांनी शाळा, रुक्मिणी निलजकर यांनी ओवी, वैदेही जाधव यांनी कहर कोरोनाचा या कविता सादर केल्या. शिवाजी शिंदे यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.