थिवी मतदारासंघात निकालापूर्वी रंगलीय चर्चा : मागील निवडणूक निकालाचा विचार करता यावेळी कडवे आव्हान ठरण्याची शक्यता
प्रतिनिधी /म्हापसा
बार्देश तालुक्यातील महत्त्वाचा आणि चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे थिवी मतदारसंघ. थिवीत गेल्यावेळच्या निवडणुकीत त्यावेळचे भाजपचे उमेदवार किरण कांदोळकर यांना 795 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. नीळकंठ हळर्णकर काँग्रेस यांना 11099 तर कांदोळकर यांना 10304 मते मिळाली होती. त्यांच्या पाठोपाठ प्रदीप घाडी आमोणकर यांना (आप) पक्षातर्फे अवघ्या 703 मतांवर समाधान मानावे लागले होते. या बलाबलाचा विचार करता या मतदारसंघात कविता कांदोळकर यांचे हळर्णकरांसमारे कडवे आव्हान ठरते की काय? अशी चर्चा मतदारासंघात रंगू लागली आहे. याबाबतचे चित्र निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
आज थिवी मतदारसंघाची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. विशेष म्हणजे दोन्हीही माजी आमदारांनी पक्षांतर केले आहे. काँग्रेसच्या नीळकंठ हळर्णकर यांनी भाजपात उडी घेतल्याने नाराज झालेल्या किरण कांदोळकर यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात जाणे पसंत केले. मागील जिल्हा पंचायत निवडणुकीत कांदोळकर यांनी खुलेआम भाजपविरोधात बंड करीत पती-पत्नी व प्रमुख कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊन गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला. तितकेच नव्हे तर येथे आपली पत्नी कविता कांदोळकर यांना जिल्हा पंचायत सदस्य म्हणून निवडून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. कविताचा पराभव करण्यासाठी थिवीत भाजपने सर्वतोपरी आपली यंत्रणा कामाला लावली होती तसेच कांदोळकरांना माघारी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र त्यांचे काहीच चालले नाही.
आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा दोन्ही समोरासमोर आहे. विशेष म्हणजे भाजपच्या हळर्णकरांसमोर यंदा किरण यांच्या जागी त्यांची पत्नी कविता (तृणमूल काँग्रेस पक्ष) यांचे आव्हान आहे. असे असले तरी तृणमूल ही नवीनच पार्टी आहे. दररोज या पक्षात थिवीतून नवीन आजी माजी सरपंच, लोकप्रतिनिधी पक्षात दाखल होताना पहायला मिळतात. याचा कितपत फायदा कविताना होतो हे गुरुवारी कळणार आहे.
थिवीची जनता किरणच्या पाठीशी राहणार काय?
थिवीत यावेळी किरण कांदोळकर नसल्याने त्यांच्या पत्नी याठिकाणी पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत आहेत. थिवीची जनता कविता यांना तृणमूल पक्षाच्या उमेदवार की किरण कांदोळकरांची समाजसेवा व आपुलकी म्हणून वैयक्तिकरीत्या त्यांच्या पाठीशी राहतात. जनतेने राज्यात अद्याप टीएमसीला स्वीकारले नाही; मात्र एकूण परिस्थिती पाहता तृणमूल मगो युतीच्या उमेदवार कविता यांच्यासमोर थिवीत एक मोठे आव्हानच आहे. माजी जिल्हा पंचायत सदस्य डायना ब्रागांझा या काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. त्यांनी कांदोळकरांना आपला पाठिंबा दिला आहे. तसेच आजी माजी पंच सदस्यही खुलेआम पुढे आले असून त्यांनी आपला पाठिंबा कांदोळकरांना दिला आहे.
दुसरी बाजू पाहता नीळकंठ हळर्णकर हे धूर्त राजकारणी आहे. शांत स्वभाव तितकेच चतुरही आहेत. 2012च्या निवडणुकीत समोरासमोरील टक्करीत कांदोळकरांना हळर्णकरांकडून 795 मतांनी पराभव स्वीकारावा लागला असला तरी यावेळची बदललेली राजकीय समीकरणे येथे वेगळी आहेत. थिवीत यावेळी आरजीतर्फे मनोज परब, काँग्रेसतर्फे अमन लोटलीकर, आपतर्फे उदय साळकर निवडणूक रिंगणात आहेत. कोविड काळ व त्यापूर्वी हळर्णकरांबाबत एक नाराजीचा सूर होता. काही मतदार त्यांच्यापासून दुरावले होते, मात्र कांदोळकरांनी टीएमसीमध्ये प्रवेश करताच हळर्णकर पुन्हा एकदा सक्रिय झाले व जोमाने प्रचार कार्यास उतरले आहे. यावेळी ते भाजपा चिन्हावर निवडणूक लढवत असून त्यांनीही आपला जोर धरलेला आहे. हा जोर कितपत यशस्वी होतो हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे.
काँग्रेसला लोबोंचा पाठिंबा
काँग्रेस पक्षाबद्दल या मतदारसंघात पाहिल्यास सध्या काँग्रेस पक्षातर्फे थिवीत माजी मंत्री मायकल लोबो यांच्या पुढाकाराने येथे समाजसेवक तथा उद्योजक अमन लोटलीकर यांना रिंगणात उभे केले आहे. हळर्णकर काँग्रेसपासून दूर गेल्याने काँग्रेस पक्षाला थिवीत वाली कोण नव्हते. मध्यंतरी कोलवाळ येथील उद्योजक उदय साळकर हे काँग्रेसच्या तिकिटावर आपला दावा करीत होते. मात्र राजकीय चालीत त्यांना डावलल्याने त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ते आपमध्ये दाखल झाले. काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या संभ्रमात असून काही जणांनी आपला पाठिंबा कांदोळकरांना तर काहीजणांनी भाजपचा मार्ग पत्करला. असे असले तरी लोटलीकरांनी येथे प्रवेश केल्याने दुरावलेले कार्यकर्ते पुन्हा आपला मूळ पक्ष कॉग्रेसकडे परतल्याचे चित्र आहे.
मागील निवडणुकीतील निकालाची आकडेवारी
- नीळकंठ हळर्णकर (काँग्रेस) मिळालेली मते 11099
- किरण कांदोळकर (भाजपा) 10304
- प्रदीप घाडी आमोणकर (आप) 703
- डगलस सिक्वेरा (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) 275 नोटा 179 अशी मते मिळाली होती.
थिवी मतदारसंघात गेल्या 11 वेळचा 1972 पासून कार्यकाळ पाहता या मतदारसंघात आजवर सहावेळा काँग्रेसने विजय मिळविला आहे. त्यात दयानंद नार्वेकरांचे वर्चस्व आहे. ते काँग्रेसच्या तिकिटावर चारवेळा तर मगो पक्षावर एकवेळा निवडून आले आहे. मगोचे उमेदवार तीनदा निवडून आले आहेत. नीळकंठ हळर्णकर काँग्रेस पक्षावर दोनदा तर भाजपतर्फे तानावडे व किरण कांदोळकर प्रत्येकी एकदा निवडून आले आहे.