बेळगाव / प्रतिनिधी
राणी चन्नम्मा चौक ते गोगटे चौकपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण युद्धपातळीवर सुरू असून, याकरिता शहराच्या पश्चिमेकडील सर्वच प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहेत. पर्यायी रस्ते खुले ठेवून नियमित रस्ता बंद करण्याची गरज आहे. मात्र, स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी सर्व नियम धाब्यावर बसविले आहेत. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे.
शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहराचा विकास होत आहे, ही बाब चांगली आहे. मात्र, विकास राबविताना शहरवासियांना कोणतीही अडचण भासणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी देखील प्रशासनाची आहे. पण या बाबतीत जिल्हा प्रशासन व स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी याकडे कानाडोळा केल्याचे निदर्शनास आले आहे. काँग्रेस रोडशेजारील गटारीचे काम अद्याप अपूर्णच आहे. अशातच तिसरे रेल्वेगेट वाहतुकीस बंद ठेवून उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. बसवेश्वर उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने येथील वाहतूक एकाच मार्गाने सुरू आहे. गोगटे चौक ते राणी चन्नम्मा चौकपर्यंतच्या एका बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असल्याने या रस्त्यावरदेखील एका बाजूने वाहतूक सुरू आहे. या रस्त्यावरून धावणारी अवजड वाहने आणि परिवहन मंडळाच्या बस अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या विकासाचा फटका विशेषत: बस प्रवासी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. शहराच्या पश्चिमेकडून येणाऱया नागरिकांना व वाहनधारकांना राजेंद्रप्रसाद चौक, ध. संभाजी चौक, संचयनी चौक, कॅम्प येथील पेट्रोलपंप जवळील रस्त्याने, फिशमार्केट, ग्लोब थिएटर जवळील रस्त्याने शहरात येता येते. पण सध्या यापैकी बहुतांश रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. काँक्रिटीकरण करताना केवळ राणी चन्नम्मा चौक, ध. संभाजी चौक, गोगटे चौक अशा तीन चौकातील रस्ते खुले आहेत. त्यामुळे वाहनधारकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे. पर्यायी रस्ते उपलब्ध करून किंवा पहिल्या टप्प्यात निम्मे रस्ते आणि दुसऱया टप्प्यात निम्मे रस्ते बंद ठेवून काँक्रिटीकरण करणे गरजेचे होते. पण सर्वच रस्ते बंद झाल्याने दुचाकी, चार चाकी वाहनधारकांना वळसा मारून शहरात यावे लागत आहे. एकेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी रहदारीचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, नियोजनाअभावी प्रवासी आणि वाहनधारकांना या विकासकामाचा फटका बसत आहे. दुसऱया बाजुच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना प्रथम रहदारीचे योग्य नियोजन करून नंतरच काम सुरू करावे, अशी मागणी होत आहे.