बंडखोर नेत्यांनी घातले भगवे फेटे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एकीकडे राहुल गांधी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान करण्यात मग्न असताना दुसरीकडे काँगेस पक्षच फुटीच्या उंबरठय़ावर उभा असल्याचे दिसत आहे. गुलाम नबी आझाद, कपील सिब्बल आदी 23 नेत्यांनी पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वाविरोधात दंड थोपटले आहेत. काँगेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्याविरोधात उमेदवार देण्याची तयारीही या नेत्यांनी चालविल्याची चर्चा आहे. रविवारी ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याने संघर्षाची नवी ठिणगी पडली असून या सर्व घडामोडींचा परिणाम नेमका कसा, किती आणि केव्हा होईल, याकडे राजकीय वर्तुळाचे उत्सुकतेने लक्ष आहे.
शनिवारी जम्मू येथे बंडाचे रणशिंग फुंकण्यात आले. गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वात येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. काँगेस पक्ष विकलांग व कमजोर झाला आहे. त्याला नवसंजीवनी मिळण्याची आवश्यकता आहे. भाजपला समर्थ पर्याय द्यायचा असेल, तर त्यासाठी मोठय़ा प्रयत्नांची आवश्यकता आहे. काँगेस सर्व धर्मांचा आणि संस्कृतींचा आदर करणारा पक्ष आहे, अशा अर्थाची भाषणे या सभेत करण्यात आली. हा सध्याच्या पक्षनेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न आहे, असा या सर्व घडामोडींचा अर्थ काढला जात आहे.
निष्ठावंतांचा पलटवार
ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिकेवर काँगेसमधील गांधी कुटुंब निष्ठावंतांनी कठोर टीका केली. पक्षाच्या विस्तारकार्यात ज्येष्ठांनी कधीही भाग घेतला नाही. मात्र, निवडणुकीतील पराभवानंतर त्याचे खापर पक्षश्रेष्ठींवर फोडण्यात हे आघाडीवर असतात, अशी खोचक टीका पूर्वीही करण्यात आली होती. काँगेसच्या सध्याच्या नेतृत्वावर पक्षातील बहुसंख्यांचा विश्वास आहे, असा दावा करण्यात आला.
राहुल गांधींविरोधात उमेदवार ?
येत्या काही महिन्यांमध्ये काँगेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत राहुल गांधींच्या विरोधात उमेदवार देण्याच्या दृष्टीने या असंतुष्ट नेत्यांनी तयारी चालविली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास काँगेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाटय़ावर येऊ शकते, असे तज्ञांचे मत आहे.
पत्राची पार्श्वभूमी
काही महिन्यांपूर्वी पक्षाच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी काँगेस पक्षश्रेष्ठींना खरमरीत पत्र पाठविले होते. काँगेसला पूर्ण वेळ काम करणारा अध्यक्ष हवा आहे, अशी सूचना त्यात करण्यात आली होती. तेव्हाच पक्षाला तडा गेल्याची भावना निर्माण झाली होती. नंतर पक्षश्रेष्ठी आणि नाराज नेते यांच्यात समझोताही झाला. पण तो तात्पुरता होता, हे ताज्या घडामोडींवरून दिसून येते असे तज्ञांचे म्हणणे आहे.
आझादांकडून पंतप्रधान मोदींची स्तुती
काँगेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी रविवारी जम्मू येथे एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीची प्रशंसा केली. पंतप्रधान मोदी हे अतिसामान्य परिस्थितीतून स्वकष्टाने पंतप्रधानपदापर्यंत पोहचले. त्यांनी स्वतःचे खरे स्वरूप लपविण्याचा प्रयत्न कधी केला नाही. त्यांचे पाय नेहमी जमिनीवर असतात. राजकारणात आम्ही प्रतिस्पर्धी निश्चितच आहोत. तथापि, एकमेकांसंबंधी आदरभाव बाळगणे हा आमच्या राजकीय संस्कृतीचा भाग आहे, अशा भाषेत त्यांनी आपले विचार व्यक्त केले. आझाद राज्यसभेतून निवृत्त होताना पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या संसदीय कार्याचे कौतुक केले होते.
भगवे फेटे ठरले आकर्षण
शनिवारी जम्मूत झालेल्या सभेत गुलाम नबी आझाद यांच्यासह काँगेसच्या सर्व असंतुष्ट नेत्यांनी भगवे फेटे परिधान केले होते. काँगेसला सर्व धर्मांचा आदर करायचा आहे, हे दर्शवून देण्यासाठी असे करण्यात आले होते, असे सांगण्यात येते. काँगेस पक्षाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेत्यांनी आवर्जून भगवे फेटे धारण करण्याचा हा कदाचित इतिहासातील प्रथमच प्रसंग असावा, असेही बोलले गेले. मात्र, यातून वेगळेच राजकीय संकेत मिळतात, अशीही चर्चा आहे.
आतापर्यंत दोनदा फूट
काँगेस पक्षात आतापर्यंत दोनदा मोठी फूट पडली आहे. पहिली फूट 1967 मध्ये पडली होती. त्यावेळी मोरारजी देसाई, निजलिंगाप्पा इत्यादी ज्येष्ठ नेते विरुद्ध इंदिरा गांधी असा सामना होता. नंतर 1978 मध्ये दुसरी फूट पडली. त्यावेळीही एका बाजूला इंदिरा गांधींचा गट तर दुसऱया बाजूला ज्येष्ठ नेत्यांचा गट असा संघर्ष होता. आता यावेळी असेच काही घडते की हे चहाच्या पेल्यातील वादळ आहे, याकडे राजकीय अभ्यासक बारकाईने लक्ष ठेवून आहेत.