मुख्यमंत्री, भाजप अध्यक्षांची टीका
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी एका मंत्र्यावर केलेले आरोप म्हणजे हवेत गोळीबार असून नाव घेवून आरोप करा, असे आव्हान भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिले आहे. सरकार व मंत्र्यांवरील आरोप नैराश्येतून होत असल्याचे प्रत्युत्तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावत यांनी दिले आहे. दोघांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत.
तानावडे यांनी सांगितले की भाजप सरकार करीत असलेल्या विकास कामांमुळे विरोधक सैरभर झाले असून त्यांच्याकडे कोणतेच विषय नसल्याने विनाकारण आरोप करीत आहेत.
कोणाचेही नाव न घेता असले गंभीर आरोप करणे राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेश अध्यक्षाला शोभत नाही. उगाच आरोप करू नका तर ते सिद्ध करा. पुरावे दाखवा असे त्यांनी पुढे नमूद केले. कोणी कितीही कसलेही आरोप केले तरी पुढील सरकार भाजपचेच असणार असा दावा दोघांनीही केला आहे.