23 जणांच्या पत्रप्रपंचाच्या वादळामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की दोन मोठय़ा पराभवनानंतरदेखील काँग्रेस नेतृत्वामध्ये शहाणपणा आलेला नाही. त्याचा ताठरपणा जराही कमी झालेला नाही.
सारे कसे अजब आणि चमत्कारिक. दोन लोकसभा निवडणुकात भरपूर मार खाऊनदेखील काँग्रेसमधील घराणेशाहीने ‘हम नही सुधरेंगे’ चा जणू विडा उचलला आहे असे वाटण्यासारख्या घटना गेल्या आठवडय़ात घडल्या. पृथ्वीराज चव्हाण आणि 22 इतर ज्ये÷ नेत्यांनी पक्षात सुधारणा व्हाव्या म्हणून लिहिलेले पत्र म्हणजे गांधी परिवाराविरुद्ध बंड मानून त्याचा बीमोड करण्याच्या अविर्भावात सोनिया, राहुल आणि प्रियांका आणि त्यांचे दरबारी वागले. ‘चिरेबंदी वाडय़ात’ चिर पाडण्यासाठी हा पत्रप्रपंच नव्हता तर पक्षात नवीन वारे खेळते होण्यासाठी श्रे÷ाrंनी कसे जबाबदारीने वागून संघटना वाढवली पाहिजे याबाबत त्यात सूचना होत्या.
राहुल गांधी यांना परत काँग्रेस अध्यक्ष बनवण्यासाठी नि÷ावंतांनी हालचाली सुरू केल्या होत्या आणि पहिल्या घासातच पानात माशी पडण्याचा हा प्रकार त्यांनी मानला. ‘सामुदायिक नेतृत्वाची’ भाषा या पत्रात बोलली गेल्याने गांधी परिवाराला मिरच्या झोंबल्या नसत्या तरच नवल ठरले असते. ‘आपल्या हयातीत अशी भाषा काढण्याची कोणाची हिम्मत’ असेच जणू सोनिया, राहुल, प्रियांकाना वाटले. काँग्रेसमधील ‘हाय कमांड’ म्हणजे फक्त आपणच असा जणू नियमच या परिवाराने घालून दिला असल्याने ‘ही पाप्याची पितर मंडळी आम्हाला कोण बरे शिकवणार?’ असा जणू सवालच केला गेला. ही पत्रलेखक मंडळी म्हणजे भाजपचे बगलबच्चे आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला होता म्हणे. पण त्यामुळे मामला गडबडू लागला आहे असे वाटल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आपण असे बोललोच नव्हतो अशी कोलांटीउडी त्यांनी मारली.
पत्र लिहिणारे हे 23 नेते म्हणजे कोणी फार तालेवार नाहीत. एक भूपिंदरसिंग हुडा सोडले तर कोणालाही फारसा जनाधार नाही. हरियाणाचे दहा वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या हुडा याना आता आपला मुलगा दीपेंदर त्या जागेवर विराजमान झालेले बघायचे आहे. राहुल गांधी यांच्या सुप्त विरोधाला न जुमानता त्यांनी आपल्या मुलाला राज्यसभा मिळवली होती. रॉबर्ट वद्राची जमिनीची वादग्रस्त प्रकरणे झाली तेव्हा हुडा मुख्यमंत्री होते. तेव्हा प्रियांका गांधींचा त्यांच्यावर वरदहस्त होता.
या पत्र लिहिणाऱयांचे म्होरके असलेले गुलाम नबी आझाद हे इंदिरा गांधींच्या काळापासून घराण्याचे वफादार मानले जातात. एक काळ असा होता की दिल्लीत अ. र. अंतुले हे बडे प्रस्थ होते, त्याकाळी आझाद पक्ष मुख्यालयात त्यांच्या कार्यालयाबाहेर बसलेले आढळायचे. पण लवकरच काळाने अशी गिरकी घेतली की आझाद राजीव गांधींच्या जवळचे झाले आणि अंतुले पक्षाबाहेर फेकले गेले. तो इतिहास झाला. पक्षात राहुल यांचा वरचष्मा वाढल्यापासून आझाद यांच्यासारख्या बऱयाच ज्ये÷ मंडळींना बाजूला सारले गेले. मोदींविरुद्ध आपण विविध मुद्यांवर आवाज उठवत असताना बऱयाच ज्ये÷ मंडळींनी आपल्याला पाहिजे तशी साथ दिली नाही अशी खंत राहुलनी पक्षाध्यक्षपद तडकाफडकी सोडताना व्यक्त केली होती. या 23 जणांनी पक्षाला ‘पूर्णवेळ अध्यक्ष’ हवा अशी मोहीम सुरू करून एकप्रकारे सोनिया आणि राहुल या दोघांना अडचणीत आणले आहे. पुत्रप्रेमाने वेडे झालेल्या सोनियानी आपल्या फक्त मुलालाच पक्षाध्यक्षपद मिळावे यासाठी 20 वर्षे या पदावर राहून एका ‘नाइट वॉचमन’ चे काम इमाने इतबारे केले हे दिल्लीतील साऱया जाणकारांना माहिती आहे. पक्षातील कोणीही नेता फारसा मोठा होणार नाही आणि राहुलना स्पर्धक बनणार नाही याची सर्वप्रकारे काळजी या दोन दशकात सोनियानी वाहिली. राहुल हे मनाने कितीही चांगले असले तरी राजकारणात नवखे, अपरिपक्व आणि बेभरवशाचे आहेत. त्यांचे बूड कधी स्थिर नसते. ते पक्ष कार्यकर्त्यांना वर्षानुवर्षे भेटत नाहीत, त्यांच्या ई-मेलला कधी उत्तर देत नाहीत असे गाऱहाणे पक्ष कार्यकर्ते नेहमी गाताना दिसतात. त्यात पक्षाच्या आमदार आणि खासदारांचादेखील समावेश आहे. गेल्या सहा-सात वर्षात बरेचजण काँग्रेस सोडून भाजपात गेले आहेत कारण राहुलनी त्यांना दुर्लक्षिले. सध्या आसाममधील प्रमुख मंत्री असलेल्या हिमंत बिस्व शर्मा यांनी तर काँग्रेस सोडण्यामागचे कारण म्हणजे जेव्हा ते राहुलना भेटले तेव्हा त्यांचे गाऱहाणे ऐकण्यापेक्षा राहुल हे त्यांच्या ‘पीडी’ या आपल्या पाळीव कुत्र्याबरोबर खेळत राहिले.
राहुल हे किती बदलतात अथवा नाही ते येणारा काळ दाखवेल. त्यांनी बदलणे हे त्यांच्याच हिताचे आहे. कारण नेतृत्वासाठी कितीही स्पर्धा झाली तरी सरतेशेवटी त्यात राहुलचाच विजय होणार आहे.
सर्व विरोधी पक्ष रालोआ-भाजपला ‘आपण एक पर्याय देऊ शकतो’ अशा पद्धतीचे ताकतवान होणे जरुरीचे आहे. सध्या प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सुरू झालेला हा गृहकलह लवकरात लवकर मिटविणे हे त्याच्या हिताचे आहे. या वादळामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की दोन मोठय़ा पराभवनानंतर देखील काँग्रेस नेतृत्वामध्ये शहाणपणा आलेला नाही. त्याचा ताठरपणा जराही कमी झालेला नाही. बदलत्या काळात बदललेल्या आव्हानांना तोंड कसे द्यायचे याचा अंतर्मुख होऊन शोध घेण्याचे दूर राहो पण आपल्यापुढे आव्हानच उभे आहे हे मानायला तयार नसणाऱया पक्षाचे भविष्य अंधकारमय राहणार आहे. काँग्रेस श्रे÷ाr असेच वागत राहिले तर पुढील 50 वर्षात देखील पक्ष सत्तेत येणार नाही असा शाप असंतुष्ट देत आहेत. सोनियानी वेळीच हे वादळ शमवण्याचे काम केले पाहिजे कारण पत्र लिहिणारे 23 च असले तरी त्यांच्यामागे बरीच नेतेमंडळी आहेत. काँग्रेसची घडी ठीक बसणे हे सोनिया आणि राहुलच्या हिताचे आहे. ते सामोपचाराने हा वाद मिटवणार की असंतुष्टांशी दोन हात करून मोदींना मजबूत करणार हे पुढील महिना दोन महिन्यात दिसणार आहे. गांधी घराण्याला ‘ओसाड गावचे पाटील’ राहायचे आहे की मोदीनंतर लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवायचा आहे त्याचे संकेतदेखील हे पक्षांतर्गत संकटाचे रूपांतर संधीत कसे केले जाते त्यावरून मिळणार आहेत.
सुनील गाताडे