अध्याय पहिला
बाप्पा राजाला सांगतायत की, ज्याला आध्यात्मिक प्रगती साधायची आहे त्याच्या दृष्टीने चांगला योग काही वेगळाच असतो. भरपूर संपत्ती, खूप विषयोपभोग, चांगले नातेवाईक ह्या गोष्टी मिळाल्या की सामान्य माणूस आनंदात असतो हे लक्षात घेऊन बाप्पा म्हणतायत, सामान्य माणूस प्रापंचिक गोष्टी मिळाल्या किंवा विनासायास एखादे काम मनासारखे घडून आले की लोक त्याला चांगला योग समजतात. मनुष्य चांगला योग कशाला समजतो ह्याची एक मोठी यादी देऊन बाप्पा सांगतात की, आध्यात्मिक प्रगती साधायसाठी त्या गोष्टी मिळणे वा मनासारखे घडणे ह्याला निश्चितच चांगला योग म्हणता येणार नाही. बाप्पा पुढं म्हणाले,
न स योगस्त्रिया योगो जगदद्भुतरूपया ।
राज्ययोगश्च नो योगो न योगो गजवाजिभि: ।। 9 ।।
अर्थ-सामान्य माणसाच्या अपेक्षांबद्दल बोलून झाल्यावर राजेमहाराजे ज्याला चांगला योग समजतात त्याबद्दल बोलताना बाप्पा म्हणाले, अलौकिक अशा स्वरूपाच्या स्त्राrशी योग होणे हा योग नव्हे. राज्ययोग हा योग नव्हे. हत्ती अथवा अश्व यांचा योग हा योग नव्हे.
योगो नेन्द्रपदस्यापि योगो योगार्थिन: प्रिय: ।
योगो य: सत्यलोकस्य न स योगो मतो मम ।।10।।
अर्थ-काही साधकांना देवलोकाचे आकर्षण असते म्हणून बाप्पा म्हणाले, योगप्राप्ति इच्छिणाराला इंद्रपदाचा योग हा देखील प्रिय नाही. सत्यलोकाची प्राप्ती होणे हा देखील चांगला योग नव्हे असे मी समजतो.
शैवस्य योगो नो योगो वैष्णवस्य पदस्य य: ।
न योगो भूप सूर्यत्वं चन्द्रत्वं न कुबेरता ।। 11 ।।
नानिलत्वं नानलत्वं नामरत्वं न कालता ।
न वारुण्यं न नैर्ऋत्यं योगो न सार्वभौमता ।।12।।
अर्थ- शिवपद अथवा विष्णुपद यांची प्राप्ती होणे हा योग नव्हे. हे राजा, सूर्यत्व, चंद्रत्व, कुबेरत्व, वायुत्व, अग्नत्, अमरत्व, यमत्व, वरुणत्व, नैत्य अथवा सार्वभौमता यांची प्राप्ती होणे हे देखील पारमार्थिक दृष्ट्या योग नव्हेत. विवरण- योग म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होणं. परमात्मा सदैव आनंदात असतो. जर आत्म्याला त्याच्यात मिसळून जायचं असेल तर त्यासाठी सदैव आनंदात रहायला हवं. सामान्य माणसाच्या दृष्टीने जे योग चांगले समजले जातात ते त्याला कायम आनंदात ठेऊ शकत नाहीत. म्हणून बाप्पा सामान्य माणसाच्या चांगल्या योगाच्या कल्पना खोडून काढतात. त्यांना चांगला योग का म्हणता येणार नाही ते समजावून सांगताना बाप्पा म्हणतायत, कायम टिकणाऱ्या वस्तूच शाश्वत आनंद देऊ शकतात पण सामान्य माणसाच्या दृष्टीने चांगल्या योगामुळे मिळालेल्या किंवा घडून आलेल्या गोष्टी कायम टिकणाऱ्या नसल्याने शाश्वत आनंद देऊ शकत नाहीत. त्या बंध निर्माण करतात. आत्म्यावर बंधनं आली की, त्यातून माणसाच्या पुनर्जन्माची खात्री होते. म्हणून त्याला चांगला योग न म्हणता भोग म्हणता येईल. अशा गोष्टी मनुष्य स्वसामर्थ्यावर मिळवू शकतो. त्याला माझ्या मदतीची गरज नाही पण ज्याला शाश्वत आनंद मिळवायचा आहे त्याच्या दृष्टीने योग कशाला म्हणता येईल ते मी आता सांगतो.
योगं नानाविधं भूप युञ्जन्ति ज्ञानिनस्ततम् ।
भवन्ति वितृषा लोके जिताहारा विरेतस: ।। 13 ।।
अर्थ- हे राजा, योग नाना प्रकारचे आहेत व त्याची प्राप्ती ज्ञानी जनांना होते. योगयुक्त झालेले ज्ञानी जगताविषयी निरिच्छ होतात, आहार आपल्या स्वाधीन ठेवतात, ऊर्ध्वरेते होतात. शाश्वत आनंद देणारे योग अनेक प्रकारचे असून ते ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी लोकांना प्राप्त होतात. आहे त्यात समाधानी असलेले ज्ञानी लोक शरीर, मन आणि इंद्रिये काबूत ठेऊन त्यानुसार आचरण करतात. त्यामुळे त्यांना नवनवीन इच्छा होत नसल्याने ते आहारजय मिळवतात व उर्ध्वरेतेही होतात.