ऑनलाईन टीम
ट्विटरने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट लॉक केले होते. त्यानंतर आता काँग्रेसच्या इतर नेत्यांसह पक्षाचं मुख्य अकाऊंटही ट्विटर इंडियाने लॉक केले आहे. यानंतर राजकीय वातावरण तापलं असून ही कारवाई मोदी सरकारच्या दबावाखाली झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यावर ट्विटरने स्पष्टीकरण दिलं असून कारवाईचं कारण सांगितलं आहे.
काँग्रेस पक्ष आणि नेत्यांच्या अकाऊंटवरून ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोस्ट करण्यात आल्या. त्यामुळे अकाऊंट लॉक करण्यात आले आहे. तसेच ही कारवाई गोपनियता आणि वैयक्तीक सुरक्षेसाठी करण्यात आल्याचे ट्विटरने स्पष्ट केले आहे.
पीडित कुटुंबीयांचा फोटो पोस्ट केल्याने कारवाई
गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीमध्ये 9 वर्षांच्या दलित मुलीची बलात्कारानंतर हत्या झाली. याप्रकरणातील पीडित कुटुंबाची छायाचित्रे पोस्ट केल्यामुळे ट्विटरने राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांची खाती लॉक केली आहेत. तसेच या प्रकरणात काँग्रेस पक्षाचे मुख्य खातेही लॉक करण्यात आले आहे. कंपनीचे नियम सर्वांना समान असून ते निप्षक्षपातीपणे लागू केले जातात. या नियमांचे उल्लंघन करत पोस्ट करणाऱ्या ट्विट्सवर आम्ही कारवाई केली आहे. अशा प्रकरणांतील वैयक्तिक माहिती ही अधिक धोका निर्माण करू शकते. त्यामुळे व्यक्तींची गोपनियता आणि सुरक्षितता जपण्याचे आमचे ध्येय असल्याचे ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले.
काँग्रेस नेत्यांची पोस्ट भारतीय कायद्याच्या विरोधात
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने बाल अत्याचारांबाबत नियमावली दिलेली आहे. ज्यात लैंगिक अत्याचार पीडितेची आणि तिच्या कुटुंबीयांची ओळख उघड करता येत नाही. परंतु, काँग्रेस नेत्यांनी केलेल्या पोस्टची पुनरावलोकन केले तर त्या पोस्ट ट्विटरचे नियम आणि धोरणे तसेच भारतीय कायद्याचे उल्लंघन करणारे आहे, असे ट्विटरने स्पष्ट केले आहे.
कुणाचे अकाऊंट लॉक ?
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासह पाच वरिष्ठ नेत्यांच्या अकाऊंटवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, लोकसभेतील पक्षाचे व्हीप माणिकम टागोर, आसाम प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांचा समावेश आहे.