राज्य सरकारचे दुर्लक्ष व्यापाऱयांची मनमानी
प्रतिनिधी/ पणजी
कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात येणार तरी कधी असा प्रश्न सध्या ग्राहकांना पडला आहे. अजूनही मार्केटमध्ये कांद्याचे दर 90 ते 100 रुपये प्रति किलो आहे. मात्र फलोत्पादन महामंडळात कांद्याचे दर प्रति किलो 62 रुपये एवढा आहे. मागील दीड, दोन महिने कांद्याने थैमान घातले आहे. पण सरकारला याचे काहीही पडलेले नाही. महागाईने सर्वसामान्यांना अडचणीत आणले आहे तर मागील दीड दोन महिने कांद्याने कहर केला आहे.
मार्केटमध्ये कांद्याचे दर उतरायला तयार नाहीत. चांगल्या प्रतिचा कांदा अजूनही 90 ते 100 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. राज्यातील साठ ते सत्तर टक्के ग्राहक हा मार्केटमधून कांदा खरेदी करतो. फलोत्पादन महामंडळात ठराविक ग्राहक जातात. फलोत्पादन महामंडळाचा जास्त फायदा हॉटेल व्यावसायिक घेतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हितासाठी मार्केटमध्ये कांद्याचे दर उतरणे आवश्यक आहे. परंतु मागील दोन महिन्यात मार्केटमधील दर नियंत्रणाबाहेर गेले आहेत. बेळगावमध्ये कांद्याचे दर उतरले आहेत. मात्र गोव्यातील मार्केटमध्ये कांदा उतरायला तयार नाही.
मार्केटमधील व्यापाऱयांची मनमानी प्रचंड वाढली आहे. कारण सरकारचे याकडे लक्ष राहिलेले नाही. मार्केटमधील दर नियंत्रणात राहिल्यास सामान्य ग्राहकाला मोठा दिलासा मिळतो. ओला कांदाही व्यापाऱयांनी मोठय़ा दरात विकला. सामान्य ग्राहक अगोदरच महागाईच्या ओझ्याखाली दबला आहे. त्याच कांद्याने कहर केल्याने ग्राहक मेटाकुटीस आला आहे. कांद्याचे दर उतरणार तरी कधी असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
सरकारचेही दुर्लक्ष
कांदा महाग झाल्यानंतर सुरुवातीला सरकारने त्याकडे लक्ष दिले, फलोत्पादन महामंडळातून थोडय़ा कमी दरात कांद्याचे वितरण केले, मात्र त्यामुळे मार्केटवर अजिबात नियंत्रण आले नाही. उलट मार्केटमधील वाढीव दर अजूनही कायम आहे. 160 रुपयांवर पोचलेला कांदा आता 90 ते 100 रुपये प्रति किलोवर आला आहे. मात्र अजूनही हा दर सर्वसामान्य जनतेच्या आटोक्याबाहेरचा आहे.