कागल / प्रतिनिधी
पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कागल जवळ बाजूला थांबलेल्या ट्रकला मारूती एर्टीगा कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने भिषण अपघात झाला. या अपघातात खारघर नवी मुंबईतील दोघेजण ठार झाले आहेत. ही धडक इतकी भिषण होती की कारच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला आहे. सोमवारी दुपारी सव्वादोन वाजता कागलच्या शाहू कारखान्याच्या कार्यालयासमोर ही दुर्घटना घडली. अपघातात ठार झालेल्या एका तरूणाची अद्याप ओळख पटलेली नाही.
पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून खारघर नवी मुंबईतील रोहित निर्भय शहा (वय २५ ) व विघ्नेश कदम ( वय २६ ) हे मारूती एर्टीगा कारमधून निपाणीच्या दिशेने चालले होते. दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमाराला ते शाहू कारखान्याच्या कार्यालयासमोर आले, यावेळी महामार्गाच्या बाजूला ट्रक थांबला होता. समोरील वाहनाला ओव्हरटेक करत असताना या ट्रकला कारने पाठीमागून जोरात ठोकरल्याने. भरधाव वेगात असलेली कार सरळ ट्रकच्या पाठीमागील बाजूस घुसली. यात कारचा चक्काचूर झाला आहे. त्यामुळे कारमध्ये असलेले रोहित शहा आणि विघ्नेश कदम (चालक ) गंभीर जखमी झाला.
यावेळी महामार्गावरून चाललेल्या प्रवाशांनी आणि जयसिंगराव पार्क मधील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रूग्णवाहिकेसह कागल पोलीसांना अपघाताची माहिती दिली. अपघातस्थळी जमलेल्यातील काहींनी कारमधील दोघांना बाहेर काढले. तसेच रुग्णवाहीकेतून त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात पाठविले. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर शहा यांचा रूग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याचे रुग्णवाहीकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
खारघर नवी मुंबईतील प्रविण जैन अँड कंपनी चॅटर्ड अकौंटस्मध्ये रोहित शहा भागीदार आहेत. कंपनीच्या कामानिमित्त ते कारमधून कर्नाटकात जात होते. दरम्यान त्यांच्या कारचा भिषण अपघात झाला. समोरील वाहनला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला. ट्रक रस्त्याच्या बाजूला थांबला होता. भरधाव वेगात ओव्हरटेक करत असताना चालकाला समोर थांबलेला ट्रक दिसला नाही. त्यामुळे त्याला कारचा ब्रेेक लावण्याचीही संधी मिळाली नाही. घटनास्थळी कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी भेट दिली. तसेच घटनेचा पंचनामा केला .