आमदार प्रसाद गावकर यांची मागणी
प्रतिनिधी / पणजी
सांगे मतदारसंघाचे आमदार प्रसाद गांवकर यांनी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन काजू बागायतदारांना वाढीव आधारभूत किंमत देण्याबाबत मागणी करून निवेदन सादर केले. या प्रस्तावावर विचार करण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. गोव्यातील बऱयाच तालुक्यातील लोक काजू उत्पादनावरच अवलंबून आहेत. त्यामुळे या विषयावर सहानुभूतीपूर्वक सरकारने विचार करावा अशी मागणीही आमदार गावकर यांनी केली.
सांगे, केपे, काणकोण, धारबांदोडा या तालुक्यातील बरीच कुटुंबे मागील अनेक दशकापासून काजू उत्पादनावर अवलंबून आहेत. हा त्यांचा पारंपरिक व्यावसाय आहे. त्याचबरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेचाही तो एक महत्त्वाचा भाग आहे. काजू उत्पादन हा अनेक कुटुंबाचा प्रमुख आर्थिक स्त्रोत आहे त्याचबरोबर ‘हुर्राक’, ‘फेणी’ यासारखे मद्य उत्पादनही केले जात आहे. मात्र काजूला चांगली आधारभूत किंमत मिळत नसल्याने शेतकरी कष्ट करूनही योग्य मोबदला मिळवू शकत नाही.
काजू बागायतीमध्ये साफसफाईचे मोठे काम असते. त्यावर सुमारे 20 हजार रुपयांचा खर्च होतो. तर काजू गोळा करणे व त्यावर प्रक्रीया करणे यावर सुमारे 30 हजार रुपयांचा खर्च येतो. त्याचबरोबर औषध फवारणी, नवीन रोपांची लागवड यावरही खर्च येतो. साळींदर, माकडे व अन्य रानटी जनावरामुळेही काजूचे नुकसान होते. साधारणपणे हे नुकसान सुमारे 20 हजार रुपये असते. त्यामुळे साधारपणे 80 हजार रुपये यामुळे वाया जातात. वार्षिक 450 किलो काजू 105 रुपये प्रति किलो दराने विकला तरी 47000 रुपये मिळतात व काजू रसाचे साधारणपणे 12000 रुपये मिळतात. जास्तीत जास्त 60 हजार ते 1 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळते. पण यातून शेतकरी आपला चरीतार्थ चालवू शकत नाही. त्यामुळे किमान 200 ते कमाल 250 रुपये प्रति किलो काजूला दर मिळावा अशी मागणी प्रसाद गावकर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली.