राज्यपालांची मुख्यमंत्र्यांना सूचना
प्रतिनिधी / पणजी
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अखेर प्रशासनाला कडक आर्थिक उपाययोजना आखण्याचे आणि काटकसरीच्या योजना हाती घेण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना त्या संदर्भात त्यांनी पत्रही लिहिले आहे.
राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत राज्यपालांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. राज्याच्या वायफळ खर्चात जी वाढ झालेली ती त्वरित दूर करा आणि कोविड 19 शी संघर्ष करताना अकारण होणाऱया खर्चाला कात्री लावा. अनावश्यक खर्च टाळून राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी तातडीने पावले उचला, असे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सध्या कोविड 19 मुळे स्थिती बिघडलेली आहे. अशा परिस्थितीत खर्चावर नियंत्रण घालून देशात एक चांगला पायंडा घाला. आपण स्वतः राजभवन कार्यालयात देखील राजभवनच्या एकंदरित खर्चात कपात करावी व काटकसर करण्यात यावी, असा आपण आदेशच दिला आहे. राज्य सरकारने खर्चाला आता आवर घालावा, असा आदेश राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
‘बरे झाले सोनारानेच कान टोचले’ : ढवळीकर
मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी राज्यपालांच्या पत्राचे कौतुक केले आहे. ‘बरे झाले सोनारानेच कान टोचले’ असे निवेदन ढवळीकर यांनी केले आहे.
माजी मंत्री ढवळीकर यांनी सायंकाळी सांगितले की, आपण गेले काही महिने व लॉकडाऊन नंतर देखील सांगत आहे की खर्चाला आतातरी आवर घाला. परंतु हे मुख्ममंत्री कोणाचेही ऐकत नाही. हे सरकार कर्ज काढून सण साजरे करीत आहे. राज्यपालांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना जो आदेश दिला आहे त्याचे आपण स्वागत करतो. आपण या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनाही खर्चात कपात करा, असे सांगितले होते. त्यानंतर आपण राज्यपालांना पत्र पाठविले तसेच पंतप्रधानांना देखील पत्र पाठवून या मुख्यमंत्र्याला आदेश द्यावा, अशी मागणी केली होती. केंद्राने दखल घेतली व राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला आदेश म्हणजे सोनारानेच कान टोचलेले आहेत. अगोदर मंत्रिमंडळ कपात करा. तसेच सर्व महामंडळाच्या चेअरमना पदावरून काढून टाका. अकारण कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करणाऱया या अध्यक्षांना तुर्तास घरीच बसवा, अशी मागणीही सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.