प्रतिनिधी/ काणकोण
काणकोण तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेले कोरोना रुग्ण आणि काही भाग कंटेनमेंट विभाग म्हणून जाहीर करण्यात आलेला असताना तसेच शनिवारी चावडीवर भरविण्यात येणारा आठवडय़ाचा बाजार काही आठवडय़ांपुरता बंद ठेवण्यात यावा अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केलेली असताना ही मागणी धुळीला मिळविण्याचा प्रकार काणकोण पालिका मंडळाकडून घडला आहे. इतके दिवस केवळ फळ-भाज्यांपुरत्या मर्यादित असलेल्या बाजाराला 24 रोजी चक्क जत्रेचे स्वरूप आले.
पालिका इमारतीसमोरची जागा आणि पालिका इमारतीमागची जागा जी पार्किंगगसाठी राखीव ठेवण्यात आली आहे ती तयार कपडे, प्लास्टिकच्या विक्रेत्यांनी अडविली होती. त्यामुळे बाजारासाठी आलेल्या कित्येक दुचाकीस्वारांची खूपच गैरसोय झाली. पालिकेच्या मार्केटमध्ये तयार कपडय़ांचा व्यापार करणाऱया बहुतेक विक्रेत्यांनी कसलाच मुलाहिजा न ठेवता आणि कोरोना विषाणूची भीती न बाळगता रस्त्यावर बाजार मांडला आणि खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी या ठिकाणी उसळली.
या प्रकाराबद्दल ज्येष्ठ नागरिक शांताजी गावकर, अनिल भगत, संजू देसाई, रणजित ना. गावकर, आनंद देसाई यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. एक प्रकारे रोगाला आंमत्रण देण्याचा प्रकार या ठिकाणी घडत असल्याबद्दल संताप व्यक्त करून त्यांनी प्लास्टिक व ताडपत्री विकेत्यांना दम भरला आणि गाशा गुंडाळायला भाग पाडले. या प्रकाराची खबर मिळताच स्वतः नगराध्यक्ष सायमन रिबेलो, स्थानिक नगरसेवक रमाकांत गावकर घटनास्थळी धावून आले आणि परिस्थिती समजून घेऊन येत्या आठवडय़ापासून यासंदर्भात कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. असे जरी असले, तरी काणकोणच्या जागरूक नागरिकांनी सोमवार 26 रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रशासनाने अधिक गंभीर बनण्याची गरज
दरम्यान, या प्रतिनिधीने नगराध्यक्ष रिबेलो यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याकडून व्यवस्थित उत्तर न मिळाल्यामुळे काणकेणचे मुख्याधिकारी आणि उपजिल्हाधिकारी अशा दुहेरी भूमिका बजावणाऱया उदय प्रभुदेसाई यांच्याशी संपर्क साधला. मात्र व्यावसायिक व्यवहार बंद ठेवण्यासंबंधीच्या सूचना जिल्हाधिकाऱयांकडून देण्यात आलेल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण शनिवारचा बाजार हा केवळ एकाच दिवसापुरता असतो. शेजारच्या कारवार प्रांताने रविवारचा बाजार सावधगिरीचा उपाय म्हणून बंद ठेवलेला आहे. काणकोणच्या बाजाराला येणारे विक्रेते बेळगाव, हुबळी या भागातून येत असतात. अशा वेळी या विक्रेत्यांना काही दिवस मज्जाव करणे ही पालिका आणि प्रशासनाची जबाबदारी असताना अजूनही काणकोणचे प्रशासन याबाबतीत गंभीर झालेले दिसत नाहे. काणकोणचे पोलीस मास्क न वापरणाऱयांविरुद्ध कारवाई करतात. त्याचबरोबर दक्षिण गोव्यात संचारबंदी आहे याचा नेमका पोलीस यंत्रणेला विसर पडतो, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहेत.
लग्नसमारंभाकडे दुर्लक्ष
या ठिकाणी दरदिवशी लग्नसमारंभ होत आहेत. दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रूचिका कटयाळ यांनी यासंबंधी जे निर्बंध घातलेले आहेत त्यांचे पालन काणकोणच्या प्रशासनाकडून होताना दिसत नाही. एखाद्या सभागृहाची क्षमता 100 लोकांची असेल, तर 50 पेक्षा अधिक लोकांना त्या ठिकाणी उपस्थित राहायला मज्जाव करायला हवा, असे सदर निर्बंधांत नमूद केलेले आहे. यासंबंधीची परवानगी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येत असली, तरी आजवर एकाही ठिकाणी सरकारी यंत्रणेने जाऊन निरीक्षण केलेले नाही. 23 रोजी या तालुक्यात जे 33 कोरोना रुग्ण आढळले त्यातील 12 जण केवळ एका लग्नसमारंभाला उपस्थित राहिल्यामुळे बाधित झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेने केवळ कागदी घोडे न नाचविता अधिक सतर्क राहण्याची गरज या तालुक्यातून व्यक्त करण्यात येत आहे.