प्रतिनिधी/ काणकोण
कोविड-19 च्या महामारीच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होते त्यावेळची परिस्थिती आणि सद्याची परिस्थिती यांचा विचार करता काणकोण तालुक्यातील कोविडबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असल्याचे दिसत आहे. काणकोण हा सीमेवरील तालुका असल्यामुळे या भागातील सीमा आणखी काही दिवस बंद ठेवण्यात याव्यात अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली होती. परंतु केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्व सीमा ज्यावेळी खुल्या झाल्या त्यातून काणकोण तालुकाही सुटू शकला नाही.
एप्रिल ते जूनपर्यंतच्या परिस्थितीचे अवलोकन केल्यास कोविडबाधितांची जी संख्या साधारणपणे 100 च्या घरात होती ती ऑगस्ट महिन्यात एकदम 177 वर पोहोचली आणि सप्टेंबर महिन्यात त्यात 223 नी वाढ होऊन 400 वर पोहोचली. त्यातील एक-दोन प्रकरणे वगळता बहुतेक सर्व जण पूर्ण ठीक होऊन आपल्या दैनंदिन कामात व्यस्त झालेले आहेत. काणकोणचे सामाजिक आरोग्य केंद्र, अग्निशामक दल आवश्यक त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याचे काम करत आहे. प्रशासन आपल्यापरीने सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचे काम करत आहे.
शेजारील भागांतून गर्दी
अजूनही चावडीवरील आठवडय़ाचा बाजार सुरू झालेला नाही. या बाजारात येणारे विक्रेते हुबळी, बेळगाव या भागांतून येत असतात. परंतु पोळे आणि माजाळी चेकनाके खुले झाल्यानंतर लगेच कारवारच्या मासेविक्रेत्या महिला तालुक्यात यायला लागल्या आणि विविध भागांमध्ये त्यांची रस्त्यावरील मासेविक्री सुरू झाली. चेकनाके खुले झाल्यानंतर पोळे येथील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी शेजारच्या माजाळी, सदाशिवगड भागांतील दुचाकी आणि अन्य वाहने घेऊन चालक गर्दी करायला लागले आहेत. तर देशी पर्यटक या ठिकाणच्या किनाऱयांवर गर्दी करायला लागले आहेत.
अजूनही गांभीर्याचा अभाव
लगेच पर्यटन हंगामाला प्रारंभ होणार आहे आणि सरकारने घालून दिलेले निर्बंध जर व्यवस्थित पाळले गेले नाहीत, तर या तालुक्यातील कोविडबांधितांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अजूनही स्थानिक लोक जितके गंभीर असायला हवेत तेवढे दिसत नाहीत. बाजारात, मासळी खरेदी करताना, पेट्रोल पंपावर सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवले जात नाही. काही जण व्यवस्थित मास्क वापरत नाहीत.
अजूनही या भागातील शाळा कधी सुरू होतील याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. मुलांना शाळा सुरू झालेल्या हव्या आहेत, तर पालक पाल्यांना शाळेत पाठवायला राजी नाहीत. शिक्षक शाळेत येतात आणि जातात. काही शाळांतील शिक्षक, कर्मचारी बाधित होण्याच्या घटना घडल्या आहेत. जे शहरांतून येतात ते प्रामुख्याने खासगी वाहनाने येतात. खासगी आस्थापनांत काम करणारे कर्मचारी नाईलाजाने बसप्रवास करतात. खासगी बससेवा अजूनही सुरू झालेली नाही. कदंब बसेस बऱयाच वेळा खचाखच प्रवासी भरून आणतात अशा तक्रारी आहेत. आज दिवसाला किमान 10 ते 15 रुग्ण आढळत आहेत. बहुतेक जण आपल्या घरीच विलगीकरणात राहणे पसंत करतात. रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी त्यात वाढच होत असून अशीच परिस्थिती राहिल्यास ऑक्टोबर महिन्यात देखील रुग्णसंख्या भरपूर वाढण्याची शक्यता दिसत आहे.