लेखिका सुधा मूर्ती यांचे प्रतिपादन : मुलांचे लाड धोकादायकच : वाचन सर्वात चांगला छंद : व्हॉट्सऍपचा अतिरेक टाळा : मुलांना कष्टाची सवय लावा
प्रतिनिधी /सांगली
माझे बोल जरी कानडी असले तरी हृदय मात्र मराठीच असल्याचे प्रतिपादन इन्फोसिस फाऊंडेशनच्या प्रमुख आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी केले. माझे बालपण कुरुंदवाड आणि कोल्हापूरमध्ये गेले. मराठी माझी मातृभाषा आहे आणि तिला मी कशी विसरू, असेही त्यांनी स्पष्ट केले. मेहता पब्लिशिंग हाऊसच्यावतीने आयोजित ‘संवाद लेखकांशी’ कार्यक्रमात त्यांनी अनेक मुद्यांवर सविस्तर विवेचन केले.
त्या म्हणाल्या, मी इंजिनिअरिंगला गेले नसते तर मी इतिहास आणि पुरातत्व शास्त्रात मोठे काम केले असते. पण, इंजिनिअरिंगला गेले आणि या विषयाकडे दुर्लक्ष झाले. पण, 60 व्यावर्षी ही इच्छा पूर्ण केली. एक वर्षाचा पुरातत्व शास्त्राचा सखोल अभ्यास केला. खिद्रापूर येथील मंदिराचा अभ्यास केला. माझी अपूर्ण इच्छा मी शिकून पूर्ण केली, असे त्यांनी सांगितले.
मुलांचे लाड कमी करा
प्रत्येक कुटुंबांत एक-दोन मुले असतात. या मुलांचे मोठय़ा प्रमाणात लाड होतात. साधी चपाती भाकरी मुलाने खाल्ली नाही तर आई लगेच केक आणि चॉकलेट त्याला आणून देते, हे अत्यंत चुकीचे आहे. मुलांना कष्ट करण्याची सवय लावा. घरातील छोटी-मोठी कामे करण्यास सांगा. एखाद्या गोष्टीचा हट्ट धरला तर त्याला तत्काळ ती देऊ नका, थोडा विलंब लावा. यामुळे त्याच्याकडे सहनशक्ती निर्माण होईल आणि त्या वस्तूचे महत्त्व त्याला समजेल. पण, मुले काही म्हणण्याच्या आधीच त्याच्या हाती सर्व वस्तू येतात, त्यामुळे कष्टाचे महत्त्वच त्याला समजत नाही.
आजही कुरुंदवाड-कोल्हापूरची आठवण
माझे बालपण कुरुंदवाड आणि कोल्हापूरमध्ये गेले, त्या घरी आजही मी जावून आले. स्वयंपाक घर, पाळणा घर, अंगण बघून मनाला शांतता लाभते. त्यामुळे माझ्या लेखनात या घरांचे वर्णन येते. कृष्णा नदीची आठवण होत असते. महापूर आला की आमच्या घरी कृष्णा नदी येत असे. तेंव्हा शाळेला सुटी मिळे आणि आनंद होई. आजही न्यूयॉर्क, बेंगळूरला असले तरी अचानक मन या दोन घरात जाते, अशी आठवण त्यांनी जागवली.
इंग्रजीतून लेखनाला 52 व्या वर्षी सुरुवात
इंजिनिअरिंग करूनही मी इंग्रजीतून लेखन करताना घाबरत असे. 52 व्या वर्षी मला अनेकांनी इंग्रजीत लिखाण करण्यास गळ घातली. नंतर मी धाडस केले, इंग्रजीत लिहू लागले. त्यातून जम बसला आणि आता मी इंग्रजीतून चांगलं लेखन करत आहे. या गोष्टीलाही आता 20 वर्षे झाली. त्यामुळे आणखी चांगल्या पद्धतीने पॉलिश करून हे लिखाण खरे खुरे होईल याकडे पाहीन, असेही त्यांनी सांगितले.
मी गृहिणी आहे. त्यामुळे सांबर करताना किती मसाला घालावा लागतो याची जाण आहे. लेखन करतानाही किती मसाला घालायचा तितकाच घालते. लेखनाची सुरुवात, मध्य आणि त्याचा शेवट अत्यंत महत्त्वाचा असून तो विचारपूर्वक केला पाहिजे. तो त्यातील मास्टर स्ट्रोक असतो. लेखकांनी लेखन करण्यापूर्वी दहा पुस्तके वाचली पाहिजेत, असा सल्ला त्यांनी दिला.
चाकू कशासाठी वापरायचा ते ठरवा
घरात चाकू हा फळ किंवा कांदा कापण्यासाठी वापरतो. तो कोणाचा खून करण्यासाठी वापरत नाही. आपल्या जीवनात ज्या गोष्टीला महत्त्व आहे, त्याच गोष्टीकडे लक्ष द्यावे. चुकीच्या गोष्टीला प्राधान्य देऊ नका.
नातीलाही काम करण्याचा दिला सल्ला
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची मुलगी सुधा मूर्ती यांची नात अनुष्का दहा वर्षांची आहे. ती थोडे थोडे लिहू लागली आहे. तिला कष्ट करण्याची सवय लाव. भांडी घासणे, कपडे वाळण्यासाठी आईला मदत करण्याचा सल्ला नातीला दिल्याचे त्यांनी सांगितले.
व्हॉट्सऍपमध्ये सर्वचजण ?
एखाद्या घरात असणारे चार लोकही दिवसभर व्हॉट्सऍपमध्ये असतात. इतके काय त्या व्हॉट्सऍपमध्ये असते, हेच मला आजपर्यंत कळलेले नाही. व्हॉट्सऍपवर येणारे 99 टक्के खोटे असते. पण, त्याच्याकडेच लोक बघतात. आता तरी लोकांनी त्याकडे दुर्लक्ष करून वाचनाकडे लक्ष द्यावे. वाचन हा सर्वात चांगला छंद आहे. घरच्या मंडळींनीच व्हॉट्सऍपकडे दुर्लक्ष केले तर नवीन पिढीही त्याकडे दुर्लक्ष करेल, असे त्यांनी सुचित केले.