पुणे / प्रतिनिधी :
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यात वाढ झाल्याने राज्यात थंडीत वाढ झाली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात किमान तापमान घटले आहे. सोमवारी नाशिकमध्ये सर्वात कमी 12.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.
उत्तरेकडील अनेक राज्यांत सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. याच्या प्रभावामुळे राज्यात थंड वाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच कोरडय़ा हवामानामुळे या थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. दिवसभर थंड हवा असून, संध्याकाळपासूनच थंडीचा कडाका जाणवत आहे. अनेक शहरातील किमान तापमान घटले आहे. मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर कोकण-गोव्यात काही ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. पुढील चार दिवस राज्यात कोरडे हवामान राहणार असून, किमान तापमान एवढेच राहण्याचा अंदाज आहे.
अधिक वाचा : मतदारयादी पुनर्परीक्षण कार्यक्रमास 9 नोव्हेंबरपासून प्रारंभ
राज्यातील प्रमुख शहरांत सोमवारी सकाळी नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे अंश सेल्सिअसमध्ये : कुलाबा 23.2, सांताक्रूझ 20.6, रत्नागिरी 21, डहाणू 19.9, पुणे 13.2, नगर 14.1, जळगाव 14.5, कोल्हापूर 18.9, महाबळेश्वर 15.6,नाशिक 12.8, सांगली 17.1, सातारा 15.5, सोलापूर 16.5, औरंगाबाद 13.9, परभणी 15.4, नांदेड 17.2, अकोला 18.1, अमरावती 15.7, बुलढाणा 17.5, ब्रह्मपुरी 19, चंद्रपुरी 19, गोंदिया 16.8, नागपूर 17.3, वाशिम 16.8, पणजी 22.5.