प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत जुना धारवाड रोडचा विकास करण्यात आला आहे. मात्र, रस्त्याच्या शेजारी असलेल्या गटारी उंच झाल्याने कामत गल्ली परिसरातील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी गटारीमध्ये साचलेले सांडपाणी जवळच असलेल्या सार्वजनिक विहिरीमध्ये पाझरत आहे. त्यामुळे दूषित पाणी वापरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. येथील समस्येची पाहणी करून समस्येचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.
उन्हाळय़ात पिण्याच्या पाण्याबरोबरच वापरासाठीच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. अशा वेळी शहरातील सार्वजनिक विहिरी आणि कूपनलिकांचा आधार घेतला जातो. प्रत्येक गल्लीमध्ये विहिरी आणि कूपनलिका असल्याने पाण्याची समस्या भेडसावत नाही. पण स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या गटारी आणि नाल्यामुळे विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी दूषित होत आहे. कामत गल्ली परिसरातील विहिरींचे पाणी पूर्णपणे दूषित बनले आहे. त्यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे.
जुना धारवाड रोडचे काँक्रिटीकरण करण्यात आले. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांचा विकास करण्यात आला असून रस्त्याच्या दुतर्फा गटारी बांधण्यात आल्या आहेत. पण कामत गल्ली शेजारून नाला वाहतो, सदर नाल्याचे बांधकाम व्यवस्थित झाले नाही. कामत गल्लीमधील गटारीचे पाणी नाल्यामध्ये जाण्यासाठी नाला खोल करण्याची गरज होती. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे गटार बांधताना नागरिकांनी तक्रार केली होती. तरीही या समस्येवर तोडगा काढण्यात आला नाही. परिणामी गटारींमधील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने सांडपाणी साचून राहत आहे. हे पाणी जवळच असलेल्या सार्वजनिक विहिरीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे विहिरीचे पाणी खराब झाले आहे. येथील गटारींची व नाल्याची पाहणी करून आवश्यक उपाययोजना राबवाव्यात. तसेच विहिरीची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.