संपर्क नेते दिवाकर रावते शिवसैनिकांवर खवळले
प्रतिनिधी/ सातारा
शिवसेना लढणारी आहे, नढणारी आहे. लढाई आली की माघारी घेणारी नाही. ज्यांच्या मनगटात ताकद नाही, हृदयात काळीज नाही त्यांनी आताच सांगा, मला काम जमत नाही, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्या अन् घरी बसा. शिवसेनेचे हे पक्ष संघटन जिह्यात मजबूत करण्याचे काम करायचे आहे. शिवसैनिक निधडय़ा छातीचा हवा, लेचापेचा नको, अशा शब्दात शिवसेनेचे संपर्क नेते माजी मंत्री दिवाकर रावते यांनी शिवसैनिकांची चांगली खरडपट्टी काढली. दरम्यान, त्यांनी शिवसंपर्क अभियानाचा आढावा घेतला. येवू घातलेल्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत सगळय़ांनी कामाला लागावे, असेही त्यांनी उपस्थित पदाधिकाऱयांमध्ये स्फुरण चेतवले.
सातारा जिह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱयांची गोपनिय बैठक प्रिती हॉटेलच्या नरिमन हॉलमध्ये माजी मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जयवंतराव शेलार, उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते, प्रताप जाधव, रामभाऊ रैनाक, संजय भोसले, सातारा तालुका प्रमुख दत्ताभाऊ नलावडे, आतिष ननावरे, रमेश बेराटे, सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, निलेश मोरे, सचिन जगताप, गणेश अहिवळे, संजय गायकवाड यांच्यासह जिह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला जिल्हा उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर दिवाकर रावते यांनी आढाव्याला सुरवात केली. प्रत्येक तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुखांकडून शिवसंपर्क अभियानात किती बैठका घेतल्या, कोणाकोणाशी संपर्क साधला याची विचारणा केली. त्यावेळी काही पदाधिकाऱयांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली तर काहींच्याकडून त्यांच्या प्रश्नांवरुन समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यावरुन रावते यांनी शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की येथे संघटना मजबूत असते. मुंबईतील शाखा प्रमुख सुद्धा ध्येयाने निष्ठेने काम करतो. समाजासाठी शिवसेना म्हणून धडपडतो. काम करतो. परंतु सातारा जिह्यात जर पद आडवून कोणी काम करत नसेल तर त्यांनी आताच सांगावे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो मंत्र दिला आहे. त्या मंत्रावर शिवसैनिक काम करत नसतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. आताच राजीनामा द्या. आम्ही राजीनामा घ्यायला तयार आहेत. शिवसैनिक कसा असला पाहिजे. लढणारा, भिडणारा आणि नडणारा, भिवून जाणारा नको आहे. साहेबांनी आदेश दिले आहेत की येवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका आपल्याला स्वबळावर लढवायच्या आहेत. निवडणुका आल्या की माघार घेणारे नकोत, निवडणूक असो वा कोणती लढाई लढणारा असावा, अशा शब्दात त्यांनी सुनावले