अध्याय पंचविसावा
त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन ईश्वर प्राप्ती करून घेणे हे माणसाचे मुख्य कर्तव्य आहे. त्यासाठी माणसाच्या स्वभावात असलेला अहंकार हा मुख्य अडथळा आहे. तो दूर कसा करायचा ह्याचे विवेचन भगवंत उद्धवाला करत आहेत. ज्या गोष्टीवर मात करायची आहे त्यासंबंधी सर्व माहिती असणे आवश्यक आहे. त्या गोष्टींची बलस्थाने कोणती हे समजले की, त्या दृष्टीने व्यूहरचना करता येते. म्हणून सुरवातीला ते त्रिगुणांची वैशि÷dय़े उद्धवाला सांगत आहेत. सत्व गुणाबद्दल सांगताना भगवंत म्हणाले, मनाचा संयम, इंद्रियनिग्रह, सहिष्णूता, विवेक, तप, सत्य, दया, स्मृती, संतोष, त्याग, विषयांच्या उपभोगांबद्दल अनिच्छा, श्रद्धा, लज्जा, आत्मरती, दान, विनय, सरलता इत्यादी सत्त्वगुणाच्या वृत्ती होत. या पंधरा लक्षणांची स्थिती ज्याच्या ठिकाणी असते, तोच शुद्ध सत्वाची मूर्ती होय. सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी भगवंताची भावना धरून निष्कपटबुद्धी ठेवणे ह्याचेच नाव शुद्ध सात्त्विकपणा होय. हाच सर्व गुणांच्या प्रभावाचा नाश करून साधकाला त्रिगुणांच्या पलीकडे पोहोचवतो. त्यासाठी माणसाने सत्त्वगुणाची वाढ करणे आवश्यक आहे कारण जसजसा सत्वगुण वाढू लागतो तसतसा रज आणि तम गुणाचा प्रभाव कमी कमी होत जातो. त्यादृष्टीने रजाची लक्षणे नीट समजून घे म्हणजे त्यांचा अतिरेक होऊ लागला की, सावध होशील. अतिशय तीव्र इच्छा करणे हे रजोगुणाचे मुख्य लक्षण आहे. रजोगुणी मनुष्य काही ना काही मिळवण्यासाठी सतत कार्यरत असतो. त्यासाठी सर्व भलेबुरे मार्ग चोखाळण्याची त्याची तयारी असते कारण त्यात आपण काही गैर करत आहोत, असे त्यास मुळीच वाटत नाही. साहजिकच इच्छा, प्रयत्न, गर्व, लोभ, ताण, अपेक्षा, भेदबुद्धी, विषययोग, युद्ध इत्यादीसाठी गर्वयुक्त उत्साह, आपल्या यशावर प्रेम, कुत्सती हास्य, पराक्रम, हट्टाने उद्योग करणे इत्यादी रजोगुणाच्या वृत्ती होत. काम म्हणजे विषयांचा हव्यास. मनुष्याला होणाऱया इच्छेतून काम फोफावतो. ज्याप्रमाणे का÷ादिकांनी अग्नि वाढतो त्याप्रमाणे कामाची इच्छा पुरविता पुरविता कामाचा हव्यासही वाढतच जातो. कामाची पूर्तता करण्यासाठी जी क्रिया करावी लागते तिला, ईहा म्हणतात. संपादलेल्या विद्येचा अतिशय गर्व वाटणे हे मदाचे लक्षण आहे. कितीही अर्थप्राप्ती झाली तरी पैसा मिळवण्याच्या वासनेची तृप्ती होत नाही, अशी जी नेहमी वाढत वाढत जाणारी आसक्ती, ह्याचेच नाव तृष्णा होय. उद्धवा! अत्यंत गर्वाने जो ताठा प्राप्त होतो, त्यामुळे समोरचा अगदीच तुच्छ वाटू लागतो त्याला ‘स्तंभावस्था’ म्हणतात. पैसा मिळविण्याकरिता इष्ट देवतेची प्रार्थना करणे याला आशा म्हणतात. भिदा म्हणजे भेद. प्रपंचाचे भान स्फुरणे व ‘हे माझे व हे तुझे’ इत्यादि जे प्रापंचिक भाषण त्याचे नांव भिदा होय. राजस सुखाचा एक मोठा चमत्कार आहे. तो हा की, विषयसुखाचे जे सर्व भोग, तेच उत्तम सुख असे मानले जाते. ह्याचे नाव सुखप्रयोग. शूराला युद्धामध्ये वीरश्री चढणे किंवा सामान्य पुरुषाला पुत्रप्राप्तीमुळे उत्साह येणे किंवा नातेवाइकांतील विवाहसमारंभामुळे आप्तइष्टांना उत्साह वाटणे, याला ‘महोत्साह’ असे म्हणतात. शास्त्रवादात जय मिळविणे किंवा युद्धात शूराचा पराभव करणे आणि त्यामुळे नावलौकिक पसरणे, ह्यालाच यश असे नाव द्यावे. उद्धवा! भाटाकडून आपली कीर्ती आपण स्वतःच दिगंती वाखाणवून घ्यावयाची असा रजोगुणी लोकांना छंद असतो कारण त्यांनी मिळवलेल्या यशाचा गवगवा व्हावा असे त्यांना वाटत असते. त्यांनी प्राप्त केलेल्या यशावर त्यांचे अत्यंत प्रेम असते, ह्याला यशःप्रीती असे म्हणतात. म्हणून जाणूनबुजून स्तुती करण्यासाठीच जी माणसे पदरी बाळगली असतात त्यांना भाट असे म्हणतात. वीर्य म्हणजे अत्यंत प्रबळ सामर्थ्य-शरीरबळ दाखविणे होय. काही लोक राजाची हांजी हांजी करून त्यांची मर्जी संपादन करतात आणि राजाच्या बळावर उदीम-व्यापार करतात, हा शिरजोरपणाचा व्यवहार. आपण म्हणू तसं राजा ऐकेल ही खात्री असल्याने असे लोक न्याय सोडून फार स्वार्थ साधतात, ह्यालाच ‘बलोद्यम’ म्हणजे शिरजोरपणा म्हणतात.
क्रमशः