मोटर वाहन कायद्याची होणार कठोर अंमलबजावणी
प्रतिनिधी / पणजी
वाहनांच्या काचा काळ्या करण्यासाठी लावलेले फिल्मिंग आणि दुचाक्यांना बेकायदेशीररित्या बसविण्यात आलेले कर्णकर्कश आवाजाचे सायलन्सर मालकांनी स्वतः हटवावे, अन्यथा वाहतूक निरीक्षक ते काढून टाकणार आहेत, असा इशारा वाहतूक खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयाने दिला आहे. त्यासंबंधीची कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांने सांगितले.
त्याशिवाय विना हेल्मेट दुचाकी चालविणे, पॅन्सी नंबरप्लेट, सिटबॅल्ट न वापरणे, यासारख्या प्रकारांवरही करडी नजर ठेवण्यात येणार आहे. रॅन्ट अ बाईक तसेच कार चालक पर्यटकांकडून गोव्यात मोटर वाहन कायदा अस्तित्वातच नाही, अशा थाटात बेशिस्त आणि अंदाधूंद वाहने चालविण्यात येत असल्याच्या असंख्य तक्रारी वाहतूक खात्याकडे पोहोचल्या आहेत. त्यांच्या भोवतीही आता कायद्याचा फास आवळला जाणार आहे. ’अतिथी देवो भव’ च्या भावनेतून वाहतूक पोलीस आणि वाहतूक निरीक्षकांनी दाखविलेली मानवतावादी वागणूक आता त्यांच्याच अंगलट आली असून दोन्ही खात्यांवर लोकांनी निश्क्रियतेचा ठपका ठेवल्यामुळे वाहतूक खाते खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे ही कारवाई कठोर करण्यात येणार आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीनेही वाहतूक नियमांचा भंग करणाऱया चालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. त्यानुसार असे नियम मोडणाऱयांचा चालक परवाना किमान तीन महिन्यांसाठी निलंबित करावा, असे सूचविले आहे. 1988 च्या मोटर वाहन कायद्याच्या कलम 19 नुसार ही कारवाई करण्यात येणार आहे.
त्यानुसार अतिवेगाने वाहन चालविणे, लाल सिग्नल असलेल्या ठिकाणी न थांबता निघून जाणे, वाहनाच्या निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, मद्याच्या नशेत वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईल फोनवर बोलणे, यासारखे गुन्हे अधिक गंभीरतेने घेण्याचे आदेश सदर समितीने दिले आहेत.
मद्य किंवा अमलीपदार्थाच्या नशेत वाहन चालविणाऱयास तर भले तो त्याचा पहिलाच गुन्हा असला तरी सुद्धा 1988 च्या मोटर वाहन कायद्याच्या कलम 185 नुसार तुरुंगातच डांबावे, असा आदेश समितीने दिला आहे.
त्याशिवाय हेल्मेट कायद्याचीही प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कठोरतेने अंमलबजावणी करावी, असेही सूचविण्यात आले असून दुचाकीवरील दोन्ही प्रवाशांना हेल्मेट वापरण्यासा भाग पाडावे असे समितीने आदेशात म्हटले आहे. विना हेल्मेट दुचाकी चालक किंवा मागे बसलेला प्रवासी सापडल्यास दंड ठोठावण्यापूर्वी दोघांनाही कमीत कमी 2 तास रस्ता सुरक्षेचे प्रशिक्षण आणि समुपदेशन करावे, असेही समितीने सूचविले आहे.
त्याच प्रकारे सिटबेल्ट न वापरणाऱया चालकासही दंड ठोठावण्यापूर्वी कमीत कमी 2 तास रस्ता सुरक्षेचे प्रशिक्षण आणि समुपदेशन करावे, असे सांगण्यात आले आहे.