ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्र सरकारने सोमवारी 59 चीनी ॲपवर बंदी घातली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर ट्विट करत निशाणा साधला.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, तिथे मॅप बदलले जात आहेत, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय. काय पोरकटपणा आहे! कारण आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहोत आणि आपण स्वाक्षरी केलेल्या कराराच्या कलम 2 आणि 14 (सी) – 2 या कलमांनुसार ही बंदी शक्य आहे का ?कशाला ही धूळफेक? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे या ॲप वर बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले होते. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले होते.