जिल्हय़ातील सर्वात मोठी ग्राम पंचायत सदाशिवगड (चिताकुला) महिलांच्या तब्यात
प्रतिनिधी / कारवार
कारवार जिल्हाधिकारी डॉ. हरिशकुमार के. यांच्या उपस्थितीत येथील जिल्हा रंगमंदिरात कारवार तालुक्यातील 18 ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. तालुक्यातील आरक्षणाची तारीख गेल्या 25 तारखेला निश्चित केली होती. तथापि त्यादिवशी मतदार दिवस असल्याने एक तारखेला आरक्षण जाहीर करण्यात आले. जाहीर केलेल्या आरक्षणानुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड पुढील 30 महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात येणार आहे.
36 सदस्य असलेली सदाशिवगड (चिताकुला) ग्राम पंचायत जिल्हय़ातील सर्वात मोठी ग्राम पंचायत म्हणून ओळखली जाते. परिणामी सदाशिवगड ग्राम पंचायतीच्या निवडणूक निकालानंतर पदाधिकारी आरक्षणाकडेही कारवार तालुकावासियांची नजर लागून राहिली होती. सदाशिवगड ग्राम पंचायतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर अनुक्रमे सामान्य (महिला) आणि ब गट (महिला) होणार आहेत. परिणामी सदाशिवगड ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर आरुढ होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या पुरुष सदस्यांची निराशा झाली आहे.
श्रीमंत ग्राम पंचायतीचे अध्यक्षपदही महिलेकडे
तालुक्यातील मल्लापूर ग्राम पंचायत सर्वात श्रीमंत म्हणून ओळखेली जाते मल्लापूर ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी कोण आरुढ होणार याबद्दलही कमालीची उत्सुकता होती. या आरक्षणानुसार या ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी सामान्य (महिला) आणि उपाध्यक्षपदी सामान्य सदस्य आरुढ होणार आहे.
सर्वांचे लक्ष पदाधिकाऱयांच्या निवडीच्या तारखेकडे
पदाधिकाऱयांची आरक्षण आज जाहीर करण्यात आल्यानंतर आता सर्वांचे लक्ष पदाधिकाऱयांच्या निवडीच्या तारखेकडे लागून राहिले आहे. त्याचबरोबर तालुक्यातील राजकीय हालचाली पुन्हा एकदा गतीमान झाल्या आहेत. तालुक्यातील काही ग्राम पंचायतीवर विशीष्ट पक्षाचे किंवा पॅनेलचे अधिक उमेदवार निवडून आल्याने पदाधिकाऱयांच्या निवडीच्यावेळी अडचणी येणार नाहीत. तथापि काही ग्राम पंचायतीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने अशा प्रकारच्या ग्राम पंचायतीवर बहुमत मिळविण्यासाठी विशीष्ट राजकीय पक्षांनी किंवा पॅनेलनी फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे असे समजते.
सदाशिवगड ग्राम पंचायतचे सदस्य घेणार जिल्हाधिकाऱयांची भेट
दरम्यान सदाशिवगड ग्राम पंचायतीचे काही सदस्य जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदापैकी किमान एक पदतरी सामान्य गटाला (पुरुष) राख्घव ठेवण्याची मागणी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन करणार आहेत. असे पाचवेळा ग्राम पंचायत निवडून आलेल्या दीपक देसाई यांनी सांगितले. दोन्ही पदे महिलांच्या ताब्यात जाणार असल्याने सदस्यांच्या मागणीला यश येणार का? हे येणार काळ ठरविणार आहे. तथापि हे काम तेवढे सोपे नाही, असे सांगण्यात आले.