ग्रामीण अभिवृद्धी-पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांची आढावा बैठकीत सूचना
प्रतिनिधी / कारवार
कारवार जिल्हय़ातील जिल्हा आणि तालुकास्तरीय अधिकाऱयांनी प्राधान्यतेवर जिल्हय़ातील सर्व तलावांचा विकास घडवून आणण्याची सूचना ग्रामीण अभिवृद्धी आणि पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी केली. येथील जिल्हा पंचायतीच्या सभागृहात ग्रामीण अभिवृद्धी आणि पंचायत राज खात्याच्या विविध कामांच्या प्रगतीचा आढावा घेऊन बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष काळजी घेत जलजीवन मिशन योजनेची अंमलबजावणी हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत देशातील प्रत्येक खेडय़ातील घरोघरी पिण्याचे पाणी नळाद्वारे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्याकरिता संबंधित खात्याच्या जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱयांनी या बाबतीत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करून मंत्री ईश्वरप्पा पुढे म्हणाले, जिल्हय़ातील विकास घडवून आणण्यासाठी तलावांची यादी तयार करून तलावातील गाळ काढण्याचे किंवा अन्य कामे मार्चपूर्वी पूर्ण करावीत. निधीची कमतरता आहे किंवा अन्य कारण सांगूण जनतेला विश्वास होणार नाही. याची दखल घेतली पाहिजे, असे
सांगितले.
यावेळी कामगार आणि जिल्हा पालकमंत्री शिवराम हेब्बार, कारवारच्या आमदार रुपाली नाईक, कुमठाचे आमदार दिनकर शेट्टी, विधान परिषद सदस्य शांताराम सिद्धी, कारवार जि. पं. अध्यक्षा जयश्री मोगेर, जि. पं. मुख्य कार्यदर्शी प्रियांगा एम. यांच्यासह ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बोळवे येथील कामाची मंत्र्यांकडून पाहणी
कारवार तालुक्यातील केरवडी ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील बोळवे येथील पिण्याच्या पाण्याच्या योजनेची पाहणी मंत्री ईश्वरप्पा यांनी केली. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना ईश्वरप्पा म्हणाले, अलिकडे आमदार बसवराज यतनाळ यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या उचलबांगडी संदर्भात वक्तव्य केले आहे. तथापि यतनाळ यांच्या वक्तव्याला अधिक महत्त्व देण्याचे काही एक गरज नाही. यतनाळ यांचे वक्तव्य आम्ही गांभीर्याने घेतलेले नाही. यतनाळ यांनी आपल्या समाधानासाठी अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या विरोधात पक्षाच्या केंद्रीय शिस्त समितीकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा विस्तार, खांदेपालट यावरून निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांच्याबरोबर बैठकीचे आयोजन करून यशस्वी तोडगा काढला आहे.
पहिल्यांदा जिल्हय़ातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवूया
अलिकडे मंत्री मुरगेश निराणी यांनी कारवार जिल्हय़ातील काळी नदीतील पाणी उत्तर कर्नाटकाकडे वळविण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी मंत्री ईश्वरप्पा यांना छेडले असता ते म्हणाले, पहिल्यांदा कारवार जिल्हय़ातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवूया. कारण जिल्हय़ातील अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचे आपल्याला कानावर आले आहे. त्यामुळे पहिल्यांदा जिल्हय़ातील तहानलेल्यांना पाणी उपलब्ध करून देऊया आणि त्यानंतर इतर शक्यतांचा विचार करता येईल, असे म्हणाले.