रामकुंड वळणावरील अपघातात महिला जखमी
वार्ताहर/ संगमेश्वर
मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरजवळच्या रामकुंड वळणावर मुंबईहून रत्नागिरीला दिशेने जाणारी कार आली असता गाडी चालकाचा ताबा सुटल्याने पुलाच्या कठडय़ावर जावून आदळली. रविवारी दुपारी 3 च्या सुमारास हा अपघात घडला.
कार चालक परशुराम पुरुषोत्तम ठाकूर (रा. रत्नागिरी फिनोलॅक्स कॉलनी) हे मुंबईहून रत्नागिरीला येत होते. ते संगमेश्वरजवळच्या रामकुंड वळणावर आले असता त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी पुलाच्या कठडय़ावर जावून जोरदार आदळली. त्यामुळे गाडीच्या दर्शनीचा भाग चेपला गेला. कारमधील महिला जखमी झाली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कंटेनरच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
रामकुंड वळणावर कारचालक विरुद्ध दिशेने समोर धडक देणार हे समजताच कंटेनरने (क्र. डी.एन. 09व्ही 9625) तत्काळ समोरील होणारी धडक वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली. मात्र कंटेनरच्या मागील बाजूस कार आदळली. कंटेनर हा गोव्यातून मुंबईच्या दिशेने जात होता. अपघाताचे वृत्त समजताच संगमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.