श्रीनगर / वृत्तसंस्था
काश्मीरमध्ये 90 च्या दशकात दहशतवादाने घातलेल्या थैमानामुळे तेथील हिंदू व पंडित समाजला आपले अधिकाराचे ‘वतन’ सोडून देशात अन्यत्र स्थलांतर करावे लागले आहे. या घटनेला यावर्षी तीन दशके पूर्ण होत आहेत. आपल्याच देशात निर्वासिताचे जिणे जगण्याची वेळ आलेला हा जगातील एकमेव समाज असण्याची शक्यता आहे. मात्र, आजही या लोकांचे मने आपल्या मातृभूमीच्या आठवणीने सद्गदित होतात. कधी ना कधी आपल्या भूमीत परतण्याची संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशा आशावादावर हा समाज आहे त्या स्थानी प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेताना दिसत आहे.
तीस वर्षापूर्वी आपली घरे सोडून गेलेल्या काश्मिरी पंडित समुदायाच्या लाखो लोकांपैकी काहीजण काश्मीरमध्ये परतण्यासाठी इच्छूक नसतील. मात्र, बहुतांश लोक परतण्यासाठी इच्छूक आहेत ही खरी वस्तूस्थिती आहे. या 30 वर्षाच्या वनवासात राहिल्यानंतर आजही त्यांना आपल्या भूमिची आठवण व्यथित करत असून, उदरनिर्वाहासह आपल्या भविष्यासाठी काश्मीरलाच ठोस पर्याय म्हणून पाहिले जात आहे. मात्र, त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा हा आहे की, काश्मीरमध्ये आता त्यांचे स्वतःचे कोणीही नाही. काश्मीर पंडित कुटुंबांचे काश्मीरला परतणे सुरूच आहे. मात्र, दहशतवाद्यांच्या भीतीमुळे आणि हल्ल्याच्या घटनांमुळे त्यातील काही परिवारांना पुन्हा माघारी परतावे लागले आहे.
काही वर्षापूर्वी कन्हैया लाल पंडित याचे कुटुंब उधमपूरच्या एका निर्वासित छावणीतून काश्मीरमध्ये परतले होते. 30 वर्षामध्ये ते मदत आयुक्त कार्यालयाकडे फेऱया मारुन वैतागले होते. मुठभर मदतीसाठी जेवढा त्रास सहन करावा लागला आहे, त्यापेक्षा काश्मीरला परतणेच चांगले, असे त्यांनी सांगितले. बडगामच्या एका गावात ते परतले आहेत. मात्र, 30 वर्षापूर्वी शेजाऱयांकडे दिलेली त्यांची स्वतःची मालमत्ता ते आता परत देण्यास तयार नाहीत. तसेच शेजाऱयांच्या दहशतीखाली रहावे लागल्यामुळे त्यांना पुन्हा जम्मूला परतावे लागले. मात्र, अशा अनुभवानंतरही काही काश्मिरी पंडित कुटुंब आजही काश्मीर परतण्याचे स्वप्न ठेवून आहेत. कारण अशा मरण्यापेक्षा आपल्या भूमीत परतणे महत्वाचे वाटते.