अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 18 मे, सकाळी 9.30
औंध येथील 32 बाधितांनी केली कोरोनावर मात!
वार्ताहर / औंध :
औंध येथे कोल्हाटी वस्तीतील 32 जण बाधित आल्याच्या बातमीने अनेकांना धक्का बसला होता. रुग्णांचे आश्रमशाळेत आयसोलेशन कक्षात विलगीकरण करून आपुलकी ग्रुप आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रुग्णांना सुविधा उपलब्ध करून दिल्याने रुग्णांनी कोरोनावर मात करून घर गाठले. ग्रामस्थांनी आपुलकीने दिलेल्या वागणुकीमुळे घरी जाताना रुग्णांना अश्रू अनावर झाले होते. याबाबत अधिक माहिती अशी, औंध गावाच्या दक्षिणेला कोल्हाटी वस्तीत कोरोनाने शिरकाव केला आणि तब्बल 32 रुग्ण बाधित आढळून आले होते. कारण गावातील दुकानात हमाली करणारे पुरुष आणि अनेक ठिकाणी धुणीभांडी करणाऱया महिलांच्या संपर्कामुळे गावातील संख्या वाढणार होती. ही साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीने आश्रमशाळेचे चेअरमन राजाभाऊ देशमुख, तहसीलदार यांच्याशी चर्चा करून आश्रमशाळेत तातडीने आयसोलेशन कक्ष सुरू करून बाधितांचे विलगीकरण करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेसावळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित ठिगळे आणि आरोग्य सेवक यांनी औषधोपचार सुरू केला. मात्र रुग्ण मोठय़ा संख्येने असल्याने त्यांच्या जेवणासाठी आपुलकी व्हाट्सॲप ग्रुपवर सोशल मिडीयातून लोकांना मदतीचे आवाहन करण्यात आले. आणि बघता बघता औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनीच यथाशक्ती मदत करून वस्तू, पैशाच्या रुपात निधी गोळा केला.
सर्व रुग्णांना दररोज चहा, नाष्टा, जेवण, पोषक आहार दररोज ग्रामस्थांनी पुरवला. आपुलकीने रुग्णांची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला. सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दीपक नलवडे सर्व ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी वेळोवळी कोरोनावर मात करण्यासाठी मदतीचा हात दिला. रुग्ण घरी जाताना महामारीच्या संकटात आपल्याच लोकांनी केलेली मदत, ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे त्यांचे अश्रु दाटून आले होते.
सर्वोतोपरी सहकार्य
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र प्रशासनाचे नियम सर्वानीच पाळले तर एकजुटीने कोरोनावर मात करू शकतो हे सिध्द झाले आहे. बाधित रुग्णांनी घाबरून जाऊ नये. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
– सोनाली मिठारी , सरपंच ग्रामपंचायत औंध.