बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या आठवडाभरापासून अधून-मधून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे किटवाडचा (ता. चंदगड) धबधबा पूर्ण क्षमतेने पुन्हा प्रवाहित झाला आहे. जलाशयातून अतिपाणी ओव्हर फ्लो होऊन प्रवाहित झालेला हा धबधबा बेळगावपासून साधारण 20 किलो मीटर अंतरावर आहे. जलाशयाच्या झिगझ्यागवरून प्रवाहित होऊन कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना साद घालत असून कळत न कळत पर्यटकांची पावले या निसर्गरम्य धबधब्याकडे वळत आहेत. त्यामुळे धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
निसर्गरम्य परिसर, तुडुंब भरलेला जलाशय आणि आजूबाजूला असलेली हिरवीगार शेती येथे येणाऱया पर्यटकांना मोह घालत आहे. त्यामुळे पर्यटक या निसर्गरम्य परिसराची सेल्फी घेण्यात दंग होत आहेत. हा धबधबा मुख्य ठिकाणी साधारण 30 ते 40 फुटावरून कोसळतो. शुभ्रधवल फेसाची उधळण करणारे हे दृष्य पाहण्यासाठी चंदगडसह बेळगाव तालुक्मयातील तरुण-तरुणींचा ओढा वाढला आहे. हा धबधबा गेल्या 5-10 वर्षांत जास्त नावारुपाला आला असून हे नयनरम्य दृष्य पाहण्यासाठी बेकिनकेरे-होसूरमार्गे किंवा हंदिगनूरमार्गे या धबधब्याकडे जाता येते. गावाशेजारी असलेल्या जलाशयाला लागूनच हा धबधबा आहे. गावात वाहने पार्क करून धबधब्यापर्यंत चालत जाता येते.
परिसरातील हिरवाई, शुभ्रधवल फेसाची उधळण करणारा धबधबा परतीच्या पावसामुळे ऑक्टोबरमध्येही पर्यटकांनी हाऊसफुल्ल होत आहे. पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा, तसेच प्रशासनाने अतिधोकादायक ठिकाणी खबरदारी म्हणून लोंखडी ग्रील बसवावेत, अशी मागणी होत आहे.
अतिउत्साह जीवघेणा ठरू शकतो
धो..धो…कोसळणाऱया धबधब्याचा आनंद लुटणाऱया पर्यटकांचा अतिउत्साह जीवघेणा ठरू शकतो. धबधब्याकडे जाणारे काही युवक मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवणे, रस्त्यावर स्टंटबाजी करणे, अतिधोक्याच्या ठिकाणी सेल्फी घेणे, असे प्रकार करताना दिसत आहेत. त्यामुळे जीवाला धोका आहे. त्यातच सध्या परतीच्या पावसामुळे परिसरातील रस्ता खचला आहे. सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. धबधब्याच्या ठिकाणी वाहने जात नसली तरी पर्यटक धोका पत्करून वाहने घेऊन जात आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.