आंतरराज्य वाहतूक पुन्हा बंद : 2016 ची पुनरावृत्ती
वार्ताहर/ कुडची
कुडची (ता. रायबाग) येथे कृष्णा नदीवर असलेल्या पुलावर शुक्रवारी पहाटे पाणी आले. त्यामुळे जमखंडी-सांगली मार्गावरील आंतरराज्य वाहतूक यंदाच्या हंगामात तिसऱयांदा बंद झाली आहे. या आधी 2016 साली या पुलावर तीनवेळा पाणी आले होते, त्याची यंदा पुनरावृत्ती झाली आहे.
कुडची पुलावरून वाहतूक बंद असल्याने सुमारे 40 कि.मी. फेऱयाने वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे. जमखंडीहून सांगलीला हारूगेरी क्रॉस, अथणी, कागवाडमार्गे सुमारे 40 कि.मी. फेऱयांने तर रायबागहून अंकली, मांजरी, कागवाडमार्गे 30 कि.मी. फेऱयाने जावे लागत आहे.
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कृष्णेची पाणीपातळी अचानक वाढली आहे. परिणामी नदीकाठावरील गावांना धोका वाढला आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने कुडची, जलालपूर, दिग्गेवाडी, भिरडी, मायाक्का चिंचली, बुवाची सौंदत्ती, गुंडवाड, शिरगुर, सिद्धापूर, खेमलापूर, यल्पारट्टी, नसलापूर गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास ऊस व अन्य पिके पाण्याखाली जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.
तहसीलदारांकडून कृष्णाकाठच्या गावात पाहणी
कृष्णेची पाणीपातळी अचानक वाढली आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी तहसीलदार चंद्रकांत बजंत्री व अधिकाऱयांनी कुडची, मायाक्का चिंचली, परमानंदवाडीसह नदीकाठावरील अन्य गावांना भेट देऊन पाहणी केली. तहसीलदार बजंत्री म्हणाले, तालुक्मयातील संभाव्य पूरग्रस्त बारा गावात प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पिकांच्या नुकसानीचा कृषी खात्यातर्फे सर्व्हे करण्यात येईल. पावसामुळे आजवर तालुक्मयात 25 घरे व भिंती पडल्याची नोंद झाली आहे. खराब झालेल्या रस्त्यांचा अहवाल लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आला आहे. गंभीर परिस्थिती उदभवल्यास दखता घेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांनी परिस्थिती पाहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. यावेळी कुडची येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एस. ए. महाजन, उपतहसीलदार हिरेमठ व अधिकारी उपस्थित होते.