भाजीपाल्यांचे दर चढेच – सर्वसामान्यांना फटका
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यातच दिवाळीनिमित्त शनिवारी एपीएमसीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली होती. त्यामुळे किरकोळ भाजीपाला बाजारातदेखील भाजीची आवक मंदावली होती. भाजीपाल्याचे दर अधिक प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. विशेषतः बाजारात कारली, वांगी, टोमॅटो, काकडी, घेवडा, गवार, भेंडी, मेथी, शेपू व कोथिंबिरचे दर आवाक्मयावर बाहेर गेले आहेत.
शनिवारच्या किरकोळ भाजीपाला बाजारात कारली 60 रु. किलो, बिन्स 80 रु. किलो, टोमॅटो 40 ते 50 रु. किलो, दोडकी 30 रु. किलो, भेंडी 50 रु. किलो, वांगी 60 रु. किलो, घेवडा 60 रु. किलो, गवार 80 रु. किलो, काकडी 50 रु. किलो, मेथी 20 रुपयांना एक पेंढी, शेपू 15 रुपयांना एक पेंढी, लालभाजी 30 रुपयांना 4 पेंढय़ा, कांदापात 20 रुपयांना 3 ते 4 पेंढय़ा दुधी भोपळा 20 रुपयांना एक, कोथिंबीर 15 ते 20 रु. एक पेंढी, पालक 20 रुपयांना 3 पेंढय़ा, फ्लॉवर 20 रु. एक, आले-लसूण प्रति किलो 100 रु., कांदे 25 ते 30 रु., किलो, बटाटा 25 ते 30 रु. किलो दराने विक्री सुरू होती. मागील पंधरा दिवसांत इंधन दरवाढीबरोबर भाजीपाल्याचे दरदेखील वाढत चालल्याने सर्वसामान्य जनतेला महागाईचा चटका सहन करावा लागत आहे.
मागील पंधरा दिवसांत कारली, वांगी, ढबू, भेंडी, दोडकी, गवार, घेवडा, मेथी, पालक, टोमॅटो, कोथिंबीर आदींच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे काही नागरिक कडधान्य खरेदीला पसंती देत आहेत.
दिवाळीचा भाजीपाल्यावर परिणाम
दिवाळीनिमित्त मागील चार दिवसात एपीएमी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे किरकोळ भाजीपाला बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा जाणवत आहे. आवक कमी झाल्याने दरातदेखील भरमसाट वाढ झाली आहे. ऐन दिवाळीत भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना दिवाळीत महागाईचा चटका सहन करावा लागत आहे.