ऑनलाईन टीम / पुणे :
फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान झालेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती… ज्येष्ठ महिलांनी मूर्तीचे केलेले पूजन व औक्षण… आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेल्या शिवरायांच्या नावाचा अखंड जयघोष अशा शिवमय झालेल्या वातावरणात 354 वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिन सोहळ्याला पुण्यातून प्रारंभ झाला. किल्ले राजगड उत्सवांतर्गत साज-या होणा-या या स्मृतीदिनाला लाक्षणिक पालखी सोहळ्याने उत्साहात सुरुवात झाली.
पुणे महानगरपालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 354 वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त ह्य किल्ले राजगड उत्सवाचे आयोजन येथे करण्यात आले आहेे. त्या सोहळ्याचा लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळा पुण्यातील सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळ येथे संपन्न झाला.
प्रदीप रावत म्हणाले, शिवचरित्र ही एक साहस कथा आहे, असे समजून त्याकडे आपण पाहिले, तर आपल्याला शिवरायांचे खरे चरित्र समजले नाही. आम्ही एक आहोत, ही भावना निर्माण करणारे शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष होते. गडकिल्ल्यांच्या माध्यमातून शिवरायांनी आताच्या पिढीकरीता राष्ट्रनिर्माणाची आधुनिक तीर्थक्षेत्र निर्माण केली आहेत. आजच्या काळातील आव्हानांवर मात करण्याकरीता शिवचरित्र हे सगळ्यांना प्रेरणादायी ठरेल.
राजगडावर शनिवार, दि. 19 डिसेंबर रोजी खंडोबाच्या माळावरती पाली गाव राजगड पायथा येथे दुपारी 4 वाजता गड जागरण कार्यक्रम होणार आहे. यामध्ये ढोल-ताशा स्थिरवादन आणि यानंतर व्याख्यान व इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रविवार, दि. 20 डिसेंबर रोजी किल्ले राजगड येथे वंशपरंपरेनुसार गडकरी असलेले सुर्यकांत भोसले यांच्या हस्ते सुर्योदयाच्यावेळी ध्वजारोहण होणार आहे. यानंतर सकाळी 8 वाजता पाली दरवाजा ते महाराजांचे सदर ते पद्ममावती मंदिरपर्यंत पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.