या महिन्याच्या 25 तारखेला मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती आहे. आजमितीला भगवतगीतेवर जगात 600 पेक्षा जास्त भाष्ये लिहिली गेली आहेत. पण प्रत्येकाने आपापले मत त्यामध्ये मांडलेले आहे. मग प्रश्न असा पडतो की भगवतगीता जर एकच असेल तर त्याचे 600 अर्थ कसे निघू शकतात? याचे कारण त्यांनी भागवतगीता त्यांना जशी समजली तशी लिहिली आहे, त्यात पूर्ण सत्य असेलच असे नाही. यासाठी भगवतगीता ज्याने सांगितली त्यांच्याकडूनच ती समजून घेतली पाहिजे. 5000 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भ्रमित झालेल्या अर्जुनाला भगवतगीता सर्वप्रथम मोक्षदा एकादशीच्या दिवशी त्याला भ्रमातून मुक्त करण्यासाठी सांगितली. त्यासाठी भगवतगीता ज्या श्रीकृष्णाने सांगितली त्या श्रीकृष्णाचेच भगवतगीतेबद्दल काय म्हणणे आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण गीता जयंतीच्या निमित्ताने दोन लेखामधून करणार आहोत.
भगवतगीतेच्या नवव्या अध्यायात स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात, राजविद्या राजगुह्य पवित्रमिदमुत्तमम्। प्रत्यक्षावगमं धर्म्य सुसुखं कर्तुमव्ययम् अर्थात सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्वज्ञानाचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. राजविद्या याचा सरळसोपा अर्थ आहे सर्व विद्यांचा राजा. या जगामध्ये अनेक विषय आहेत, पण सर्वच विषयांचे ज्ञान सर्वानाच आहे असे नाही. आणि ते शक्मयही नाही. पण भगवतगीतेचे ज्ञान सर्वाना असणे महत्त्वाचे आहे कारण प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित अशा प्रश्नाचे उत्तर यामध्ये आहे. म्हणून या ज्ञानाला राजगुह्य असेही म्हटले आहे. या ज्ञानाला पवित्र आणि उत्तम असेही म्हटले आहे कारण बाकी सर्व विषयाचे ज्ञान आपल्याला अंधकारात ढकलून देते. पण भगवतगीतेचे ज्ञान आपल्याला त्या अंधकारातून बाहेर काढते. हे ज्ञान अनुभवाने जाणता येणारे आहे. धर्म्यम म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव असलेला सेवा आणि प्रेम हे गुण पूर्णपणे भगवंताशी संबंधित कसे विकसित करावे ह्याचे ज्ञान देणारे आहे. सुसुखं म्हणजे अत्यंत सुखकारक असा हा मार्ग आहे. कर्तुमव्ययं म्हणजे या मार्गाचे पालन करणे हे सर्वांचे सनातन कर्तव्य आहे. पुढच्याच श्लोकामध्ये भगवान हे ज्ञान पालन का करावे ह्याचे वर्णन करताना सांगतात अश्रद्दधाना: पुरुषा धर्मस्यास्य परन्तप ।अप्राप्य मां निवर्तन्त मृत्युसंसारवर्त्मनि अर्थात हे परंतप अर्जुन, ज्याची या भक्तिमार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्याचे पुनरागमन होते. सारांशाने भगवतगीतेचे ज्ञान आपल्याला जन्म, आजारपण, म्हातारपण आणि शेवटी येणारा मृत्यू यातून कायमचे मुक्त करू शकते. यासाठी अंधश्रद्धेच्या अथवा स्वतःच्या मनाप्रमाणे भक्ती अथवा अध्यात्माचे पालन न करता भगवत गीतेच्या मार्गदर्शनानुसार भक्ती करणे आपल्या हिताचे आहे. त्याचप्रमाणे तिसऱया अध्यायाच्या 31 व्या श्लोकामध्ये भगवान सांगतात ये मे मतमिदं नित्यमनुति÷न्तिमानवाः । श्रद्धावन्त।़नसूयन्त मुच्यन्त ते।़पि कर्मभिः अर्थात जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशाचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. याचा अर्थ असा आहे की आपण सर्वजण भगवान श्रीकृष्णाचा द्वेष करतो आहोत म्हणून या दुःखी जगामध्ये आपण जन्म घेऊन कर्मबंधनांमध्ये अडकलेलो आहोत म्हणूनच त्यातून कसे मुक्त व्हावे हे सांगण्यासाठीच भगवतगीतेचे ज्ञान भगवंतांनी दिले आहे ते पालन करण्यातच आपले हित आहे. जे या ज्ञानाचे पालन करीत नाहीत त्यांचे काय होते हेही पुढील श्लोकामध्ये भगवंत वर्णन करतात. ये त्वेतदभ्यसूयन्त नानुति÷न्ति मे मतम् । सर्वज्ञानविमूढा स्तान्विद्धि नष्टानचेतसः अर्थात परंतु जे द्वेषभावनेने या आदेशांची उपेक्षा करतात आणि त्यांचे पालन करीत नाहीत त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे. म्हणजे ज्याप्रमाणे या जगात सरकारचे नियम पालन न केल्यास आपल्याला शिक्षा होते त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशाचे पूर्ण पालन न केल्यास आपल्याला जन्म मृत्यूच्या दु:खाचे पुनः पुन्हा कष्ट भोगावे लागतात.
काही लोकांना वाटते की भगवतगीता म्हणजे फक्त कर्म करा असे शिकवते, पण ते अर्धवट ज्ञान आहे. भगवतगीता आपल्याला कोणत्या भावनेमध्ये कर्म करावे हे शिकवते. नाहीतर भगवतगीतेचे काहीही ज्ञान नसलेले गाढवसुद्धा कर्म करत नाही का? भगवतगीता आपल्याला कर्म कसे करावे हे शिकवणारे परिपूर्ण शास्त्र आहे. हे परिपूर्ण शास्त्र केवळ मनुष्यजन्मातच आपण समजून घेऊन पालन करू शकतो म्हणूनच पशु पक्षी प्राणी यापेक्षा मनुष्यजन्म श्रे÷ मानला जातो. म्हणून मनुष्य जन्मात केवळ आहार, निद्रा, भय, आणि मैथुन याचा उपभोग घेण्यातच मनुष्यजन्म वाया न घालवता भगवतगीतेचा उपदेश समजून घेऊन जीवनात पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
हे समजून देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सोळाव्या अध्यायातील 23 व्या श्लोकामध्ये सांगतात य: शास्त्रविधिमुत्सज्य वर्तते कामकारत: । न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् अर्थात जो शास्त्रविधीचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगतीही प्राप्त होत नाही. या श्लोकामध्ये कामकारतः हा शब्द फार महत्त्वाचा आहे. जी व्यक्ती जाणूनबुजून भगवतगीतेच्या उपदेशांचे उल्लंघन करते ती काम, क्रोध, मद, लोभ मोह, मत्सर या षड्रिपुच्या आहारी जाऊन कर्म करीत असते तिला पूर्णपणे माहीत असते की मी जे करतो ते चुकीचे आहे पण तरीही ती असे निषिद्ध कर्म करते. यालाच स्वेच्छाचार असे म्हटले जाते. अशी व्यक्ती भगवंताच्या शिक्षेला पात्र ठरते. मानवी जीवन हे विशेषकरून चित्तशुद्धीसाठी आहे पण जी व्यक्ती विधिविधानांचे पालन करीत नाही ती वास्तविक सुखही प्राप्त करू शकत नाही.
म्हणून भगवान श्रीकृष्ण पुढील श्लोकामध्ये सांगतात तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ । ज्ञात्वा शास्त्रविधानोक्त कर्म कर्तुमिहार्हसि अर्थात मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिजे. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः आध्यात्मिक जीवनामध्ये उन्नती होईल. मनुष्याने भगवतगीतेच्या आदेशाप्रमाणे कार्य करावे यालाच शास्त्रतत्त्वाचे पालन करणे असे म्हणतात. अपूर्ण इंद्रिये, फसविण्याची वृत्ती, चुका करणे आणि भ्रमित होणे हे आपल्यामध्ये आढळणारे चार दोष आहेत. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली भगवत गीता ह्या चारी दोषापासून मुक्त आहे. म्हणूनच दोषातीत असणाऱया शास्त्रामधील विधिविधानांचा आचार्य, संत महात्म्यांनी काहीही बदल न करता स्वीकार केला आहे. या दिव्य ज्ञानाचा जगाच्या उद्धारासाठी ‘इस्कॉन’ तर्फे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी डिसेंबर महिन्यामध्ये संपूर्ण जगामध्ये अनेक भाषांमध्ये लाखो भक्त भगवत गीता वितरित करतात. या ज्ञानाची आज अंधकारामध्ये चाचपडत असलेल्या करोडो दिशाहीन लोकांसाठी गरज आहे.
वृंदावनदास (भाग 1)