खुनानंतर पाय धडावेगळे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी/ बेळगाव
किल्ल्याजवळ शनिवारी दुपारी दोन मानवी पाय सापडले आहेत. कुठेतरी खून करून पाय धडावेगळे करुन पुरावे नष्ट करण्यासाठी ते किल्ल्याजवळ टाकून दिल्याचा संशय आहे. यासंबंधी मार्केट पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
किल्ल्याला लागूनच असलेल्या खंदकाजवळील एका खड्डय़ात दोन्ही पाय टाकून देण्यात आले होते. मध्यवर्ती बसस्थानकातून सध्या ज्या प्रवेशद्वारातून बसेस बाहेर पडतात तेथून जवळच हा प्रकार उघडकीस आला आहे. घटनेची माहिती समजताच मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन दोन्ही पाय ताब्यात घेतले असून एका पोत्यात बांधून ते सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविण्यात आले आहे. किल्ल्याजवळ सापडलेले पाय स्त्राrचे आहेत की पुरुषाचे याची पडताळणी करण्यासाठी बिम्स्च्या फॉरेन्सीक तज्ञांना पत्र देण्यात आले आहे. रविवारी सायंकाळपर्यंत ते स्पष्ट होणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार ते पाय एखाद्या महिलेचे असावेत, असा संशय असून फॉरेन्सीक तज्ञांच्या पाहणीनंतरच त्याचा उलगडा होणार आहे. कोठे तरी खुन करुन पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करुन ते किल्ल्याजवळ टाकण्यात आले आहेत. यासंबंधी भा.दं.वि. 302, 201 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव शहर व तालुक्मयात बेपत्ता झालेल्यांची यादी पडताळण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. कारण दोन्ही पायांची सध्याची अवस्था लक्षात घेता किमान 8 ते 10 दिवसांपूर्वी ते धडावेगळे केल्याचा संशय आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून तपास अधिकारीही चक्रावून गेले आहेत.
पाच वर्षांपूर्वीही घडली होती घटना
पाच वर्षांपूर्वी किल्ल्याजवळच एका महिलेचे दोन पाय तोडून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्याच महिलेचे धड येळ्ळूरजवळ आढळून आले होते. यासंबंधी मार्केट व बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाले असले तरी अद्याप खून झालेली महिला कोण? तिचा खून कोणी व कशासाठी केला? याचा पाच वर्षांनंतरही उलगडा झाला नाही. तोच शनिवारी आणखी दोन पाय आढळून आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.