वार्ताहर / कुंभोज
कुंभोज येथील बाबु कासार घर ते मासुर्ले कॉर्नर ह्या भागातील लोकांना गेली २० वर्षे विकासापासून वंचित राहावे लागत आहे. भागातील नागरिकांना वारंवार तक्रारी करूनही लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष आहे.परिणामी कुंभोज गावातील इंदिरानगर ,शाहूनगर, शिवाजीनगर, माळभाग अशा अनेक भागातील अनेक सामाजिक, शैक्षणिक, समस्या अद्याप लोकप्रतिनिधींना पूर्ण करणे जमले नाही. परिणामी सदर प्रभागातील नागरिक गेले कित्येक वर्ष केवळ आश्वासनावरच राहिले आहेत, येणारा प्रत्येक लोकप्रतिनिधी आम्हाला केवळ आश्वासने देतो विकास कामे करत नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदान करायचे का नाही हे ठरवावे लागेल अशा प्रकारच्या तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
सदर प्रभागामध्ये तांबोळी गल्ली, कोळी गल्ली, हूजरे गल्ली, नदाफ गल्ली, वाघमोरे गल्ली, मुलाणी गल्ली, चर्मकार गल्ली,कुंभार गल्ली, तसेच दादगोंड गल्ली व पोतदार गल्ली यांचा समावेश आहे. इतका मोठा प्रभाग असुनही ग्रामपंचायती बरोबर लोकप्रतिनिधींचेही लक्ष नाही. भागातील रस्त्याचे डांबरीकरण २० ते २२ वर्षापूर्वी निवेदिता माने खासदार असताना झाले आहे. त्यानंतर आज तागायत डांबरीकरण करण्यात आले नाही. यावर सर्व प्रतिनिधी उडवा – उडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेतात.
गल्लीतील गटर्स ह्या चार – चार महिने तशाच भरून असतात. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाडला आहे. रोगराईचे प्रमाण वाढले आहे. भागातील काही गल्लीमध्ये कॉक्रीटिकरण झाले आहे. काही गल्लीतील कॉक्रीटिकरण पूर्णतः खराब झाले आहे. सदर भागात पाणी पुरवठा सुध्दा योग्य वेळेत होत नाही. याबाबत ग्रामसभेत तक्रार केली आहे. परंतू अध्याप अंमलबजावणी झाली नाही. परिणामी गावातील अनेक रस्ते गटस मात्र कागदावर ती पूर्ण असून प्रत्यक्षात मात्र कामे अपूर्णच असल्याचे चित्र आहे कुंभोज मधील अनेक प्रभागांच्या विकासाकडे विद्यमान लोकप्रतिनिधी त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत असून अनेक प्रभागातील रस्त्यावरून वाहतूक करणे म्हणजे नागरिकाची तारेवरची कसरत होत आहे. परिणामी येणार्या निवडणुकीत लोकप्रतिनिधींना विकास कामे करायचे नसतील तर त्यांनी मत मागण्यासाठी येऊ नये अशा प्रकारच्या तीव्र भावना प्रभागातील लोकांच्यातुन व्यक्त होत आहे.
विद्यमान प्रतिनिधींनी तत्काळ लक्ष घालून सदरची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.
सचिन कोळी ( माजी ग्रामपंचायत सदस्य).
सदर समस्या जाणिवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न होत असेल तर, विद्यमानांच्या प्रतिनिधींनाहि इकडे मतदानासाठी फिरकू नये. तुकाराम शिंदेवाले ( माजी ग्रामपंचायत सदस्य)