एप्रिल-डिसेंबर दरम्यान 1029 शस्त्रक्रिया : जि. प. आरोग्य समिती सभेत माहिती
प्रतिनिधी / ओरोस:
कोरोना कालावधीत कुटुंब नियोजनच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया करणारा जिल्हा अशी सिंधुदुर्गला नवी ओळख प्राप्त झाली आहे. एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत कुटुंब नियोजनाच्या 1029 शस्त्रक्रिया करून जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे, अशी माहिती आरोग्य सभापती सावी लोके यांनी दिली.
जिल्हा परिषद आरोग्य समितीची मासिक सर्वसाधारण सभा बॅ. नाथ पै सभागृहात लोके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, सदस्य लॉरेन्स मान्येकर, उन्नती धुरी, श्रीया सावंत, शर्वाणी गावकर, नूतन आईर, राजेश कविटकर, प्रभारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी, अन्य विभागांचे अधिकारी, खातेप्रमुख आदी उपस्थित होते.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कोरोना काळातही करण्यात आल्या. एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने 1029 शस्त्रक्रिया केल्या. डिसेंबर या एकाच महिन्यात 169 शस्त्रक्रिया झाल्या. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत सिंधुदुर्ग राज्यात पहिल्या स्थानावर असल्याचे सांगत लोके यांनी आरोग्य विभागाच्या या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले.
महामार्गालगतच्या कसाल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शस्त्रक्रिया खोलीला गळती लागली आहे. या ठिकाणी शस्त्रक्रिया होत नाहीत. जिल्हय़ात अशी अनेक आरोग्य केंद्रे आहेत. त्यांच्या दुरुस्तीवर आतापर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आले. तरीही नागरिकांना होणाऱया त्रासाला जबाबदार कोण? असा सवाल करीत लॉरेन्स मान्येकर यांनी याबाबतची माहिती पुढील सभेत ठेवण्याची मागणी केली. पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम अर्धवट असल्याने आणि नागरिकांनी गैरसोय होत असल्याने संबंधित ठेकेदाराला पुढील सभेत माहिती देण्याची सूचना करण्यात आली. तसेच उपकेंद्रांना देण्यात आलेल्या ईसीजी मशीन वापराविना पडून असल्याकडेही मान्येकर यांनी लक्ष वेधले. यावेळी या मशीन आवश्यक असणाऱया केंद्रांना दिल्या जाणार असल्याचे डॉ. खलिपे यांनी स्पष्ट केले.
कंत्राटी कर्मचाऱयांच्या वेतनालाही शासनाकडून जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे आता कंत्राटी कर्मचाऱयांचे मानधन जीएसटी कपात करूनच दिले जाणार असल्याचे डॉ. खलिपे यांनी सांगितले. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे. कोरोना काळात नितांत आवश्यकता असतानाही पालकमंत्री या गाडय़ा देण्यास वेळ का लावत आहेत?, असा सवाल मान्येकर यांनी केला.