सुरक्षा यंत्रणेकडून मच्छीमारांना सतर्कतेचे अन् सहकार्याचे आवाहन
मालवण:
देशाच्या सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱया ‘सागर सुरक्षा कवच’ मोहिमेप्रमाणे जिल्हय़ात मंगळवार, 12 जानेवारी रोजी सकाळी 8 पासून ते बुधवार, 13 जानेवारी रोजी रात्री 8 पर्यंत ‘सी-व्हीजिल’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत मच्छीमार बांधव मासेमारीस जाताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवतात का तसेच संशयास्पद हालचालींबाबत सुरक्षा यंत्रणेस किती तत्परतेने स्थानिक नागरिक व मच्छीमारांकडून माहिती दिली जाते, याची चाचणी घेतली जाणार आहे. या अनुषंगाने जिल्हय़ातील सागरी किनारी भागातील नागरिक, मच्छीमार बांधवांनी सतर्क राहवे, असे आवाहन सुरक्षा यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
स्थानिक मच्छीमार समुद्रात मासेमारीस गेले असता, कुणी अनोळखी व्यक्ती आम्ही पोलीस विभागातील अथवा सरकारी अधिकारी असल्याची खोटी माहिती देत आमची नौका समुद्रात बंद पडली आहे, असे सांगून आम्हाला किनाऱयावर सोडा, असे सांगत असतील, तर त्यांना किनाऱयावर न आणता, तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात तसेच पोलीस नियंत्रण कक्ष, कोस्टल टोल फ्री क्रमांक 1093 वर माहिती देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मच्छीमारांनी अभियानादरम्यान जास्तीत जास्त बायोमॅट्रीक कार्ड व नौकांशी संबंधित सर्व कागदपत्रे तपासण्याकरिता पोलिसांना सहकार्य करावे. पोलीस पाटील, ग्रामरक्षक दल सदस्य, सागर रक्षक दल सदस्य, रक्षक यांनी सतर्क राहून सागरी किनारी भागात संशयित बोट, जहाज तसेच संशयित व्यक्ती, वस्तू, वाहन तसेच समुद्रात अगर किनारी भागात काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात अथवा पोलीस नियंत्रण कक्ष कोस्टल फ्री क्रमांक 1093 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानात समुद्र तसेच सागरी सुरक्षेशी निगडीत सर्व विभाग कार्यरत राहणार आहेत. fee-interest-rate-emi/