वार्ताहर/ कुद्रेमनी
कोरोना रोगाच्या वाढत्या प्रसारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गावच्या सर्व सीमा बंद करण्याचा निर्णय कुद्रेमनी ग्राम पंचायतीने घेतला असून शनिवारी कार्यवाही केली व गावात विविध नियम जारी केले आहेत.
बेळगाव-चंदगड महामार्गावरील शिनोळी गाव फारच जवळील कर्नाटक-महाराष्ट्र सीमा हद्द रस्ता पूर्णपणे बंद केल्यामुळे बेळगाव-चंदगड तालुक्यातून मोठय़ा प्रमाणात होणारी वाहनांची वर्दळ कुद्रेमनी गावातून होत आहे. ट्रक्स, टेंपो, दुचाकी वाहने तसेच अन्य ठिकाणाहून ये-जा करणाऱयांच्याही वर्दळीत वाढ झाल्याने रोगापासून गाव संरक्षणासाठी सीमाबंदीचा निर्णय घेण्यात आला.
ग्राम पंचायत सदस्य, शासकीय अधिकारी यांची शनिवारी बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. ग्रा. पं. अध्यक्षा सौ. असिता सुतार, उपाध्यक्षा मल्लव्वा नाईक, सदस्य दीपक पाटील, काशिनाथ गुरव, संजय पाटील, मोहन पाटील, नागेश राजगोळकर, शामला गुरव, निर्मला सुतार, मंगला हरिजन, पीडीओ प्रकाश कुडची, सचिव श्री. किल्लेकर, उल्का जाधव, कर्मचारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
बेळगाव, खानापूर, चंदगड, तालुक्यातील अनेक खेडय़ांना जोडणारे रस्ते कुद्रेमनी गावावरून जातात. त्यामुळे हे गाव सर्व बाजुनी केंद्रस्थानी आहे. सध्या शिनोळी सीमाहद्द बंद झाल्याने विविध भागातून मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ कुद्रेमनी गावावरून वाढल्यामुळे गावकऱयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्राम पंचायतच्यावतीने शनिवारी वाहतुकीची वर्दळ असलेल्या रस्त्यांवर बंदी घालण्यात आली. बेळगाव-चंदगड रस्त्यापासून गावाकडील ऍप्रोच रस्ता, तुर्केवाडीला जोडणारा डांबर रस्ता, ढेकोळी गावाकडे जाणारा बेरडशेत नाला रस्त्यांवर मोठे मातीचे बांध घालून होणारी वर्दळ रोखण्यात आली आहे. गावापासून सोनोली, बेळगुंदी, सुरुते गावातील स्वयंसेवक युवकांच्या तुकडय़ा तैनात केल्या आहेत. त्यामुळे बाहेरुन गावात कुणालाही येता येणार नाही, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
गावामध्ये कुणाच्या घरी पै-पाहुणे आलेले असतील तर त्यांच्या घरी त्यांना पाठवून देण्याबाबत गावात दवंडी देऊन नागरिकांना पंचायतीने कळविले आहे. बाहेरगावाहून कुणीही कामगाराने गावातील काम करू नये. गावातील कामगारांनी गावातीलच कामे करावीत, असा आदेश जारी करण्यात आलेला आहे.
रविवारी सकाळी सर्व सीमाबंद झाल्यामुळे सोनोली, कुद्रेमनी जोडरस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी होऊन रस्त्यावर लांबलचक रांगा लागल्या होत्या. देवरवाडी, कोनेवाडी, तुरमुरी मार्गावरून बेळगावकडे वर्दळ वाढली असून कोनेवाडी गावच्या प्रवेशावार झाडांच्या फांद्या टाकून रस्ता बंद झाल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांची कोंडी दिवसभर सुरू होती. सध्या या भागात केव्हा कोणता रस्ता बंद होईल व केव्हा चालू होईल याचा नेम नाही. शेतवडीतील रस्ते असून पावसाने सर्वत्र चिखल, दलदलीची स्थिती निर्माण झाल्याने दुचाकीस्वारांची तारांबळ उडत आहे.
परगावाहून आलेल्यांची शाळेत व्यवस्था बाहेरगावी काम, नोकरीसाठी असलेले गावातील काही नागरिक म्हैसूर, मंडय़ा, मुंबई, पुणे येथून गावात आलेले आहेत. त्यांची व्यवस्था मराठी व कन्नड प्राथमिक शाळा खोल्यांमध्ये स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. पाच जणांची तपासणी करून त्यांना घरी पाठविण्यात आले. सध्या दहा ते बारा जण वास्तव्यास आहेत. हायस्कूलमधील मध्यान्ह आहार स्वयंपाक खोलीतून स्वयंपाक व्यवस्था सुरू आहे. ग्रा. पं. सर्व सदस्य, आशा कार्यकर्त्या, पंचायतीचे पीडीओ, सचिव, शाळा सुधारणा मंडळ सदस्यांसह शिक्षक व स्वयंपाकी महिला, ग्रा. पं. आदींकडून त्यांची देखभाल नियम पाळून केली जात आहे.