क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना करावा लागतो अस्वच्छतेचा सामना
प्रतिनिधी / बेळगाव
परराज्यामधून बेळगावात येणाऱया नागरिकांना सरकारी संस्थांमध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र क्वारंटाईन करण्यात आलेल्या हॉस्टेलमध्ये आवश्यक सुविधा नसल्याने नागरिकांचे हाल होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अतिवाड येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्या 35 नागरिकांना एकच स्वच्छतागृह असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. याठिकाणी अस्वच्छता निर्माण झाल्याने क्वारंटाईन करण्याचा उद्देश हरवला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रसार नियंत्रणात होता. मात्र लॉकडाऊन शिथिल करून परराज्यातील नागरिकांना स्थलांतर होण्याची मुभा देण्यात आल्याने कोरोना विषाणू बांधिताच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून परराज्यामधून शहरात दाखल होणाऱया प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून सरकारी संस्थेमध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे. राज्यांतर्गत स्थलांतर केलेल्या नागरिकांना घरात क्वारंटाईन करण्यात येत आहे. राज्यातील विविध भागामधून बेळगाव शहरात आलेल्या 57 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. साडेतीनशेहून अधिक नागरिकांना सरकारी संस्थेमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. कुमारस्वामी लेआऊटमधील मुलांचे हॉस्टेल, सदाशिवनगर येथील मुलांचे व मुलींचे हॉस्टेल तसेच जुने बेळगाव येथील निवारा शेल्टर, समाज कल्याण खात्याच्या वसतिगृहात अशा विविध ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या खोल्या पूर्ण क्षमतेने भरल्याने नव्याने काही सरकारी संस्थांचा शोध घेण्यात येत आहे. पण याठिकाणी क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी पिण्याच्या व वापराकरिता पाणी नसल्याने पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच स्वच्छतागृहाची स्वच्छता व्यवस्थित केली जात नसल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
झोपण्यासाठी गादी उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र चादर नसल्याने नागरिकांना घरामधून आवश्यक साहित्य आणण्याची वेळ आली आहे. क्वारंटाईन केलेल्या सरकारी संस्थांमध्ये नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे काही नागरिक हॉटेलमध्ये क्वारंटाईन राहणे पसंद करीत आहेत. पण याकरिता नागरिकांना अर्थिक भुर्दंड बसत आहे.
अस्वच्छतेमुळे डासांचा उपद्रव
ग्रामीण भागातदेखील परराज्यातील नागरिकांना सरकारी शाळेमध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे. पण शाळेत कोणत्याच सुविधा नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अस्वच्छतेमुळे डासांचा उपद्रव सोसावा लागत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी म्हणून क्वारंटाईन करण्यात येत आहे. पण क्वारंटाई&न करण्यात येणाऱया परिसराची अस्वच्छता पाहता क्वारंटाईन करण्याचा उद्देश काय, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
अतिवाड येथे पाणीटंचाई
अतिवाड येथील शाळेत 35 हून नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पण याठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना दैनंदिन वापरासाठी पाणी उपलब्ध नाही. तसेच 35 नागरिकांसाठी एकच स्वच्छतागृह असल्याने दैनंदिन विधिसाठी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामुळे क्वारंटाईन केलेल्या सरकारी संस्थाची स्वच्छता राखण्यात यावी तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.