हिंडलगा परिसरातील समस्या : अधिकाऱयांकडे वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
प्रतिनिधी/बेळगाव
सुरुवातीला पावसाचा जोर वाढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पण सध्या पावसाने पाठ फिरविली असून, शेतातील भातपीक व अन्य पिकांना पाणी मिळत नसल्याने वाळण्याच्या स्थितीत आहेत. बॉक्साईट रोड हिंडलगा परिसरातील शेती विद्युतपंपांचा विद्युत पुरवठा गेल्या 15 दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे असंख्य शेतकरी अडचणीत आले आहेत.
सध्या निसर्गाच्या खेळापुढे शेतकरी हतबल झाला आहे. यापूर्वी कोरोनामुळे पिकांना भाव नाही, अवेळी पडणाऱया पावसामुळे पिकांचे नुकसान, तसेच शेतमजूर रोहयो कामाला जात असल्याने मजुरांची टंचाई अशा असंख्य अडचणीत शेतकरीवर्ग अडकला आहे. सध्या पावसानेही पाठ फिरवली असल्याने भातपिकाचे नुकसान होत आहे. भातपेरणी करण्यापूर्वीच पावसाने जोर केला होता. त्यानंतर जून-जुलैमध्ये जोराचा पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शेतात पाणी झाल्यामुळे रोप लागवडीला जोर आला होता. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली असून, महिना झाला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतीवाडीतील संपूर्ण पाणी आटले आहे.
तसेच मार्कंडेय नदीची व विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे भातपिकासाठी विद्युतपंपांद्वारे पाणी सोडावे लागत आहे. विद्युतपंपांचा वापर शेतकरी करीत असल्याच्या कारणास्तव शेतीपंपांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. आंबेवाडी, अलतगा आणि हिंडलगा अशा विविध परिसरातील विद्युत वाहिन्यांद्वारे विद्युतपंपांना वीजपुरवठा केला जातो. पण हिंडलगा बॉक्साईट रोड परिसरातील शेतीवाडीतील विद्युतपंपांचा पुरवठा गेल्या 15 दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शेतात पाणी सोडणे मुश्कील बनले असून, जाणीवपूर्वक विद्युत पुरवठा बंद केल्याचा आरोप होत आहे.
वरिष्ट अधिकारी-लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी
या समस्येबाबत शेतकऱयांनी हिंडलगा येथील विद्युत पुरवठा कार्यालयातील अधिकाऱयांची भेट घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. आज- उद्या करण्यात येईल, असे सांगून विद्युत पुरवठा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. शेतकऱयांना मोफत विद्युत पुरवठा केला जातो. त्या कारणास्तव शेतीपंपांच्या विद्युतवाहिन्यांची दुरुस्ती किंवा ट्रान्स्फॉर्मर बदलण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे वरिष्ट अधिकाऱयांनी तसेच या भागातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन शेतकऱयांच्या समस्येचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.