वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाचा कहर असतानाही कृषी क्षेत्राने मागच्या वर्षी एकंदरीत चांगली कामगिरी पार पाडली असल्याचे दिसून आले आहे. आवश्यक ते उत्पादन घेण्यात शेतकऱयांनी यश मिळवलं आहे. मागच्या आर्थिक वर्षात कृषी अन्नधान्यांच्या निर्यातीत चांगली वाढ झाली आहे.
2020-21 आर्थिक वर्षात 11 महिन्यात (एप्रिल ते फेब्रुवारी) 2.74 लाख कोटी रुपयांच्या कृषी उत्पादनांची निर्यात करण्यात आली आहे. वर्षाआधी 2.31 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत निर्यात 16 टक्के अधिक राहिली आहे. याच कालावधीत कृषी संबंधीत वस्तुंच्या आयातीतही 3 टक्के वाढ झाली आहे. एप्रिल ते फेबुवारीच्या काळात 1 लाख 41 हजार 34 कोटी रुपयांच्या कृषी उत्पादनांची आयात करण्यात आली आहे. भारत गेल्या काही वर्षात कृषी उत्पादनाच्याबाबतीत समृद्ध राहिला आहे. अन्नधान्याचे उत्पादन पुरेसे घेतले गेल्याने भारतभरात अन्नधान्याचा तुटवडा जाणवलेला नाही.
गव्हाची निर्यात वाढली
याउलट गव्हाचे अधिकचे घेतलेले उत्पादन अधिक कामी आले आहे. गव्हाची भारताने मोठय़ा प्रमाणात निर्यात केली आहे. मागच्या वर्षी 425 कोटी रुपयांच्या गव्हाची निर्यात करण्यात आली होती, त्या तुलनेत चालू वर्षात 3 हजार 283 कोटी रुपयांच्या गव्हाची निर्यात करण्यात आल्याचे सांगितले जाते. काही देशांना त्यांच्या विशेष मागणीवरून गव्हाची त्या त्या देशांना निर्यात करण्यात आली आहे. एकंदरच कृषी अन्नधान्याच्याबाबतीत भारताने केलेली कामगिरी कौतुकास्पद म्हणावी अशी झाली आहे.