कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनी केल्या सूचना : बी-बियाणे, खते उपलब्ध करण्याबाबत चर्चा
प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा आहे. त्यामुळे शेतकऱयाला लॉकडाऊनमुळे कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हय़ातील सर्व कृषी अधिकाऱयांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. शेतकऱयांना देण्यात येणारी बी-बियाणे व त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची खरेदी वेळेत करा, अशी सक्त ताकीद कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनी केली आहे. त्यांची अडवणूक कोणत्याही परिस्थितीत करू नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाविरोधात लॉकडाऊनमुळे शेतकऱयांची समस्या जाणून घेण्यासाठी कृषीमंत्री बेळगावात आले होते. यावेळी त्यांनी सरकारी विश्रामधाम येथे अधिकाऱयांची बैठक घेऊन सूचना केल्या. शेतकऱयांना लागणारी बी-बियाणे, खते, कीटकनाशक औषधे उपलब्ध करून द्या. खरेदी करताना त्यांना कोणताही त्रास होता कामा नये, असे मंत्र्यांनी सांगितले. शेतकऱयांच्या कोणत्याही वाहनाला अडवू नये, त्यांचा माल खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
40 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध केली जातील
खरीप पेरणीसाठी 6 लाख टन खत आवश्यक आहे. पेरणी मेच्या अखेरीला सुरू होते. त्यानंतर जूनमध्ये पेरणीला जोर येतो. त्यामुळे मेच्या पहिल्या आठवडय़ातच सर्व बी-बियाणे व खते उपलब्ध करणे गरजेचे असल्याचे कृषी अधिकारी व शेतकऱयांनी सांगितले. त्यावर मंत्री बी. सी. पाटील यांनी सर्व बी-बियाणे व खते उपलब्ध करण्यासाठी सरकारने सर्वतोपरी तयारी केली असल्याचे सांगून 40 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध केली जातील, असे सांगितले.
कुक्कुटपालन व्यवसायाला मदत करणे गरजेचे आहे. तेव्हा जिल्हा प्रशासनाने त्यांना लागणाऱया वस्तू उपलब्ध करण्याबाबत दक्षता घ्यावी. त्यांच्या कोणत्याही वाहनाला अडवू नये, त्या व्यवसायावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी लक्ष द्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. लॉकडाऊनचे गांभीर्य साऱयांनीच जपणे गरजेचे आहे. लोकांनीही त्यासाठी सहकार्य करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
आमदार महांतेश कवटगीमठ यांनी इतर राज्यात पाठविण्यात येणारा भाजीपाला व फळांबाबत दोन्हीकडच्या अधिकाऱयांनी सल्लामसलत करून ती वाहतूकही सुरळीत करण्याबाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. कारण बेळगावातून गोवा व महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात फळांची व भाजीपाल्याची निर्यात होते. तेव्हा सीमाभागातील अधिकाऱयांनी चर्चा करून अशा वाहतुकीला परवानगी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजीपाला खरेदी आणि विक्रीच्या ठिकाणी औषधांची फवारणी होणे गरजेचे आहे. भाजीपाला व फळांवर फवारणी करण्याबाबत प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत प्रादेशिक आयुक्त अमलन बिश्वास यांनी व्यक्त केले. कृषीमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी यांच्याकडून जिल्हय़ातील लॉकडाऊनबाबतचा आढावा घेतला. या बैठकीला आमदार सतीश जारकीहोळी, आमदार अनिल बेनके, जिल्हा कृषी सहसंचालक झिलानी मोकाशी, शेतकरी संघटनेचे सिद्धाप्पा मोदगी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
चिकन खाल्ल्यास काहीच होणार नाही
कोरोना हा आजार चिकन खाल्ल्यामुळे होतो असा गैरसमज पसरविण्यात आला आहे. मात्र चिकन खाल्ल्याने असा कोणताच आजार होत नाही. तेव्हा मनात कोणतीही शंका न बाळगता चिकन खावू शकता, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.