प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमुळे शहरातील व्यवहार पूर्णपणे थांबले असून महापालिकेचे दैनंदिन कारभारदेखील ठप्प झाले आहेत. जन्म-मृत्यू दाखले, इमारत बांधकाम परवानगी, विकासकामे आणि व्यवसाय परवाने अशा विविध कामांसाठी नागरिक महापालिकेत धाव घेत असतात. पण गेल्या पंधरा दिवसांपासून सर्व कामे बंद ठेवण्यात आली असल्याने मनपातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी केवळ कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी धडपडत आहेत.
कोरोना विषाणूंचा प्रसार झपाटय़ाने वाढत आहे. संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याकरिता जिल्हा प्रशासन, महापालिका, आरोग्य खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस धावपळ करीत आहेत. एरवी नागरिकांची गर्दी राहणारे महापालिका कार्यालय ओस पडले आहे. जन्म-मृत्यू दाखले घेण्यासाठी दररोज शेकडो नागरिक महापालिका कार्यालयात रांगा लावून थांबत असतात. पण जन्म-मृत्यू दाखले घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने हा विभाग बंद ठेवण्यात आला आहे.
विशेषत: मार्च आणि एप्रिल महिन्यात घरपट्टी वसुलीकरिता विशेष मोहीम राबविण्यात येते. फेब्रुवारी महिन्यात या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला होता. घरपट्टी आणि गाळय़ांचे भाडे वसूल करण्यासाठी कारवाईची मोहीम राबविण्यात येत होती. मात्र देशात कोरोना विषाणूंचा शिरकाव झाल्याने खबरदारी घेण्यासाठी विविध योजना राबविण्यास प्रारंभ करण्यात आला. लॉकडाऊनमुळे मालमत्ता कर वसुली मोहीम थांबली आहे. यामुळे महापालिकेच्या महसूल विभागाला 35 कोटी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. मार्च महिना अखेरपर्यंत उद्दिष्ट पूर्तीसाठी वसुली मोहीम राबविण्यात येणार होती. पण मनपाच्या सर्व मोहिमांना कोरोना विषाणूचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे घरपट्टी वसुली थांबली आहे. एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱयांना पाच टक्के करसवलत देण्यात येते. पण सध्या घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांना घरामधून बाहेर पडणे मुश्कील बनले आहे. मुख्यत: पंधरा दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प झाले असल्याने नागरिकांची आर्थिक घडी कोलमडली आहे. त्यामुळे घरपट्टी कशी भरायची, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाल्याने मनपाच्या कारभारासह महसूल वसुलीला फटका बसला आहे.
महापालिका कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभाग, सामान्य प्रशासन विभाग, महसूल विभाग, जन्म-मृत्यू दाखले विभाग, इमारत बांधकाम परवानगी विभागांसह सर्व कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. केवळ आरोग्य विभागाचे कामकाज युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी कार्यरत आहेत. शहरातील व्यवहारावर नजर ठेवणे, व्यवसाय सुरू असल्यास बंद करण्यासाठी नागरिकांना सूचना करणे, परगावांहून कोणी नागरिक आले असल्यास त्याची माहिती घेऊन आरोग्य खात्याला देणे, निर्जंतुक औषध फवारणी करणे, भाजीमंडई बंद करणे, सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी करण्यासाठी मार्किंग करणे, होम क्वॉरंटाईनकरिता हॉटेल उपलब्ध करणे अशा विविध जबाबदाऱया मनपाच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांवर सोपविण्यात आल्या आहेत. झोपडपट्टी, बंदिस्त करण्यात आलेल्या परप्रांतीयांना आणि हॉटेल व लॉजमध्ये होम क्वॉरंटाईन ठेवलेल्या नागरिकांना अन्न पुरवठा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे दररोज आठ नागरिकांना सकाळी नाष्टा, दुपारी आणि रात्रीचे जेवण पुरविण्यात येत आहे.