मौनाचे महात्म्य जाणून घेताना आपण बघितले की, सद्गुरु आपल्याला निंदा, स्तुती, वाद संवाद यापासून दूर ठेवून नामस्मरणात गुंतवतात. आता आपण जेव्हा असे ठरवतो की आपल्याकडून आपण निंदा, स्तुती, वाद संवाद या कशात पडायचे नाही. पण इतरेजन तुमची निंदा करायला, तुमच्याशी वाद घालायला, थोडक्मयात म्हणजे तुम्हाला उचकवायला टपलेलेच असतातच. त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायला शिकणे याचे नाव आर्जव! अहिंसा या गुणानुसार सत्शिष्याने प्राणीमात्राकडे जागेपणीच काय पण स्वप्नातसुद्धा वक्रदृष्टीने पहायचे नाही. त्याला इजा होईल असे वागायचे नाही. प्राणीमात्रांना जर दुखावले तर त्यांच्यातल्या भगवंताला दुखावल्यासारखे होईल हा विचार गुरुदीक्षेमुळे त्याच्या मनात दृढ असतो. त्यामुळे भगवंताशिवाय तिळमात्रही जागा रिकामी नाही हा विचार त्याला मनोमन पटलेला असतो. हरीच्या लीला थोर आणि अगाध आहेत त्यांचे गायन करावे, म्हणजे भक्ताबरोबर भगवंतही आनंदित होतो. भक्ताची चित्तवृत्ती निर्मळ होते आणि मनात ध्यानाची मूर्ती ठसते. अशा भक्ताच्या मनातला ‘मी आणि माझे’ हा भाव संपूर्ण मावळलेला असतो. म्हणून ज्या गोष्टीची त्यांना अत्यंत आवड असते ते सर्व गुरुवाक्मयावर विश्वास ठेवून भक्त ‘कृष्णार्पण’ करत असतो. एक क्षणभरसुद्धा तो देवाला विसरू शकत नाही. अशा पद्धतीने तो पूर्णपणे कृष्णमय होऊन जातो.
कीर्तनाच्या वेळेस समोरच्या श्रोत्यांना तो गुरुस्थानी मानतो. त्यामुळे हरिकृपेने दोघांनाही अद्वितीय ज्ञानाचा लाभ होऊन परमानंद उचंबळून येतो. अशा आत्मसुखाची गोडी एकदा लागली की दुःखाच्या राशी जळून जातात व भक्ताला संपूर्ण स्वानंद प्राप्त होतो. हरिकथा ऐकणारा आणि सांगणारा दोघांनाही मोठे पुण्य लाभते. भगवंताचे प्रेमाने नाव घेतले तरी सारी पातके नाश पावतात, मग देव स्वतः अंतःकरणात प्रकट होणार म्हटल्यावर तेथे पातक उरेलच कसे? हृदयामध्ये हरी प्रकट झाला की डोळय़ातून आनंदाश्रू ओघळू लागतात, अंगावर रोमांच उभे राहतात, गहिवरून येते, आनंदाने हसूही येते. तो म्हणतो, ‘आजपर्यंत देहाच्या अहंकारामुळे मोह आणि मदाने ग्रस्त झालो होतो. गुरुंनी बोध केला, कृपा केली त्यामुळे मुक्त झालो.’ असे म्हणून तो परमानंदाने डोलू लागतो. जो मनुष्य मी कर्ता आहे असे अहंकराने न म्हणता कर्म करतो, ते कर्म सहजवृत्तीने ईश्वराला अर्पण होते. हीच ‘नैष्करम्यसिद्धि’ होय. कुठलीही क्रिया शास्त्राप्रमाणे करणे आवश्यक आहे. सुरुवातीला विधिवत आसन घालून मूर्तिपुढे बसावे. शिकवल्याप्रमाणे प्राणायाम आणि न्यास करून शरीरशुद्धी आणि चित्तशुद्धी करून घ्यावी मग मूर्तिपूजन करावे. अशी ही पूजा फक्त मूर्तीची होते असे नाही, तर सर्वच ठिकाणी भगवंत आहे असे समजून त्याला समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीत पाहण्याचा प्रयत्न करावा. श्रद्धा ही अत्यंत महत्त्वाची आहे. देहातील अहंकार सोडून परमेश्वराला शरण जाणे हेच याचे मर्म आहे. मन आणि बुद्धीच्या पाठोपाठ अहंकार जात असतो हे लक्षात घेऊन मन आणि बुद्धीने सदैव ईशचिंतन करावे म्हणजे अहंकाराला थारा मिळणार नाही.
(अध्याय तिसरा समाप्त)
क्रमशः