प्रतिनिधी/ सातारा
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून रेठरे बुदुक (ता. कराड) येथील कृष्णा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाला अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे.
रेठरे येथील कृष्णा नदीवरील पूल दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा पूल राष्ट्रीय महामार्ग व रेठरे बुद्रुकमार्गे सांगली जिह्याला जोडणारा दुवा आहे. सध्या अस्तित्वात असणारा पूल कमी उंचीचा आहे. तो पावसाळ्यात वारंवार पाण्याखाली जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अवजड वाहनांच्या दळणवळणाने सध्याचा पूल खचला असल्याने बांधकाम विभागाने काही महिन्यापूर्वी पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद केली होती. काही दिवसांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी बांधकाम विभागाची तातडीने बैठक घेऊन पुलाच्या मजबुतीचा अहवाल मागविला होता. त्यानंतर फक्त हलक्या वाहनांसाठी हा पूल सुरु करण्यात आला होता.
यामुळे अवजड वाहतूक तसेच उसाच्या ट्रक्टरची वाहतूक कराड शहरातून होत होती. वाहतुकीवर परिणाम होत होता. थोडय़ा अंतरासाठी मोठा वळसा घालून यावे लागत होते. या भागातील शेतकऱयांच्या मागणीवरून व रेठरे बुद्रुक येथील पुलाचे महत्व लक्षात घेता चव्हाण यांनी नवीन पुलाच्या उभारणीसाठी निधी मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या पुलाकरिता 45 कोटींची मान्यता मिळाली असून यावर्षी सुरुवातीस 65 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पुलाच्या उभारणीमुळे राष्ट्रीय महामार्गावरील रेठरे बुद्रुक, खुबी, गोंदी या गावांसह सांगली जिह्याला जाण्यासाठी दळणवळण सुकर होणार आहे. हा पूल कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीस वरदान ठरणार आहे.
यापूर्वी चव्हाण यांनी पाचवड-कोडोली नवीन पूल उभारणीला 45 कोटीं रुपयांचा भरघोस निधी मंजूर करून आणला होता. आता त्या पुलाचे कामही सुरु झाले आहे. आता आणखी एक महत्वपूर्ण असा रेठरे बुद्रुकचा पूल मंजूर झाल्याबद्दल या भागातील जनतेने पृथ्वीराजबाबांचे अभिनंदन करीत समाधान व्यक्त केले आहे.