कृष्ण रंग आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. तो अशुभ किंवा असुंदर नाही. आपल्या दोन महाकाव्यांचे नायक, आपले देवश्रीराम आणि श्रीकृष्णहे दोघे सावळय़ाच रंगाचे होते. गीतरामायणात गदिमांनी श्रीरामाच्या बाळलीलांचे वर्णन करताना म्हटले आहे,
सावळा गं रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो अष्टगंधांचा सुवास निळय़ा कमळांना येतो
सावळा गं रामचंद्र माझ्या हातांनी जेवतो उरलेल्या घासासाठी थवा राघूंचा थांबतो
तर श्रीकृष्णाचे वर्णन करताना म्हणतात,
घनश्याम नयनी आला, सखे, मी काजळ घालू कशाला
रोमांचांनी नटली काया हिरेमाणके कशास राया? कशास मोहनमाळा?
भूपाळीमध्ये श्रीकृष्णाला उठवताना म्हटले आहे,
घनश्याम, सुंदरा, श्रीधरा, अरुणोदय झाला,
उठी लवकरी, वनमाळी, उदयाचळी मित्र आला. जसे श्रीराम आणि श्रीकृष्ण, तसाच आपला विठ्ठल. कवी सुधांशुंनी आपल्या प्रसिद्ध गीतात त्याचे वर्णन केले आहे
देव माझा विठू सावळा, माळ त्याचि माझिया गळा
श्रीकृष्णाप्रमाणे द्रौपदीदेखील सावळी होती, नव्हे, काळीच होती. म्हणून तिच्या सौंदर्याचे वर्णन करताना तिला कृष्णा, श्यामा म्हटले आहे. पण असे असून आपल्याला गोऱया रंगाबद्दल आकर्षण का, याचेच नवल वाटते. टीव्हीपासून वर्तमानपत्रांपर्यंत सर्व माध्यमांमध्ये त्वचा गोरी करण्याच्या जाहिराती दिसत असतात. वधूवर सूचक मंडळांच्या जाहिरातीतल्या उपवर मुलांना गोरी बायको हवी असते. आपलीच एनआरआय माणसे विदेशात गेल्यावर त्यांच्या गोऱया रंगापुढे फिकी पडतात. पण तरी तिथल्या कृष्णवर्णीयांशी आपुलकीने वागत नाहीत. एनआरआयच्या एका लेखात मोठय़ा कौतुकाने लिहिले होते की आम्ही आपपसात त्यांना वपु म्हणतो. पण हा सांकेतिक शब्द त्यांच्या लक्षात येऊ लागला आहे. इथपर्यंत होते ते होते. पण आता टीव्हीवरच्या निर्मात्यांनी आमचे श्रीराम, श्रीकृष्ण, द्रौपदी, विठ्ठल यांना बदलण्याचा का घाट घातला ते समजत नाही. पौराणिक मालिकेतला श्रीराम गोरापान, श्रीकृष्ण गोरापान, द्रौपदी गोरीपान. इतकेच काय, नव्याने येऊ घातलेल्या मालिकेत गोऱयापान विठ्ठलाला पुंडलिकाच्या संदर्भात अटी घालणारा खलनायक काळाकुट्ट. आमच्या देवांच्या भूमिका करायला यांना सावळय़ा रंगाचे कलाकार मिळत नाही का? आपली महाकाव्ये आणि त्यांचे विद्रुपीकरण कोण थांबवील?