देवकीचा पिता देवक याला सत्राजित म्हणाला-मित्रवर्या! माझी सद्गुणी, सुंदर कन्या सत्यभामा ही वयात आली आहे. तिला श्रीकृष्णाला अर्पण करावी अशी माझी इच्छा आहे. तरी कृपया आपण मध्यस्थी करून वडीलधाऱया मंडळींशी बोलून या कार्याला श्रीकृष्णाचा होकार मिळवून द्यावा. आपले माझ्यावर मोठे उपकार होतील. त्याप्रमाणे देवकाने यादवांचा राजा उग्रसेन याच्या जवळ सत्राजिताचा विनंती प्रस्ताव मांडला. उग्रसेनाने वसुदेव, बलराम व श्रीकृष्ण यांना बोलावून घेतले व म्हणाला-सत्राजिताने कृष्णाची माफी मागितली आहे. तो कृष्णाला शरण आला असून आपली गुणी कन्या कृष्णाला अर्पण करण्याची इच्छा त्याने प्रकट केली आहे. त्याच्यावर कृपा करून आपण त्याच्या विनंतीचा स्वीकार करावा. स्वतःच्या मुखाने त्याने आपली करुणा भाकली आहे. यापेक्षा गौरवाची गोष्ट कोणती? जो सहृद, आप्त, हीन, दीन आपल्याला शरण येतो त्याचा स्वीकार करून त्याला आपल्या समान करावे, हेच श्रे÷त्वाचे भूषण होय. राजाचे बोलणे ऐकून वसुदेव व बलराम कृष्णाला म्हणाले-कृष्णा! आपण राजाज्ञेचा मान राखावा. सत्राजिताची विनंती मान्य करून त्याच्या कन्येचा स्वीकार कर. या सर्वांच्या विनंतीचा कृष्णाने सन्मान केला आणि सत्राजिताची कन्या सत्यभामा व कृष्ण यांचा विवाह मोठय़ा आनंदात पार पडला. सत्राजिताने कन्येच्या विवाहात कन्यादान करताना आंदण म्हणून स्यमंतकमणी कृष्णाला अर्पण केला आणि आपल्यावरील कलंक पुसून टाकला.
तये समयीं श्रीभगवान । सत्राजिताप्रति बोले वचन ।
स्यमंतक हा मणि आंदण । आम्हांलागूनि न पाहिजे ।
कां पां न पाहिजे म्हणसी । तरी ऐकावें इयेविषीं ।
देवप्रसाद हा ज्याचा त्यासी । इतरा प्रयासीं न रक्षवे ।
तुम्हीं सूर्यभक्त अनन्य । जाणोनि रवि झाला प्रसन्न ।
तेणें प्रसादा स्यमंतकरत्न । दिधलें पूर्ण कृपेनें ।
तें सफल्यें तुम्हांचि पासीं । सुप्रसन्न ऐश्वर्येंसीं ।
शोभायमान सद्गुणराशि । क्षोभें इतरांसी विघ्नकर ।
पूर्वीं जमदग्नीच्या करिं । प्रसादा सुरसुरभि निर्जरिं ।
दिधली असतां बलात्कारिं । कार्तवीर्यें अपहरितां ।
सुरभि गेली अमरसदना । कार्तवीर्य मुकला प्राणा ।
हैहयाच्या वंशवना । भार्गवानळें जाळियलें ।
तयाचि वणवयामाझारी । झाली निःक्षत्र धरित्री ।
देवताप्रसाद ऐशियापरी । न शोभे इतरिं अपहरितां ।
ऐशिया अनेक उपपत्ति । पुराणान्तरिं बोलिल्या असती । तथापि प्राणी लंपट होती । ते वरपडती विघ्नातें । यालागीं तुमचा तुम्हांचि पासीं । देवताप्रसाद देवभक्तांसी । असो याचिया फळभोगासी । आम्ही अधिकारीसर्वस्वें ।
सत्राजिताने कृष्णाला स्यमंतकमणी अर्पण केला पण त्याने तो स्वीकारला नाही. त्यावेळी कृष्ण सत्राजिताला म्हणाला-हे सत्राजिता! तू आदराने आंदण म्हणून आम्हाला हा स्यमंतकमणी अर्पण केला आहेस. पण आम्ही याचा स्वीकार करणार नाही. याला कारण काय म्हणून विचारशील तर देव प्रसाद हा ज्याचा त्याला लाभतो. तो ज्याला प्राप्त झाला असेल त्यानेच त्याचे रक्षण करावे. इतरांना त्याचे रक्षण प्रयत्नपूर्वकही करता येत नाही.
Ad. देवदत्त परुळेकर