महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला म्हणतात-हे राजा! अक्रूर द्वारका सोडून गेल्याने द्वारकेवर एका मागून एक संकटे कोसळली असे हे जे प्राचीन ऋषी म्हणत आहेत, ते कृष्ण महिमा विसरले आहेत काय? अक्रूर व कृतवर्म्याच्या सल्ल्यानेच शतधन्व्याने सत्राजिताचा खून केला होता. हे त्यांचे कूकर्म हे विसरून हे अक्रूराची स्तुती कशी करतात? कृष्ण द्वारकेत असताना अक्रूर द्वारकेतून बाहेर गेल्याने संकटे कोसळली असे म्हणणे असंबद्ध आहे. जो सर्व कल्याणकारी आहे, तपोधनांचा आशीर्वाद ज्याला प्राप्त आहे, मुनी सदैव कृष्णाठायीच वास करतात असा कृष्ण द्वारकेत असता अरिष्ट येईलच कसे? अक्रूर गेल्याने ते आले असे म्हणावे तर कृष्णाचा महिमा राहिला कोठे? स्फुल्लिंग दिसला नाही म्हणजे अग्नी नाही असे म्हणता येईल काय? लाटा दिसत नाहीत म्हणजे समुद्र नाहीसा झाला असे म्हणता येईल काय? तसे अक्रूर नसल्याने कृष्णाच्या सामर्थ्यात न्यूनता आली असे म्हणता येत नाही.
हें ऐकोनि राजा पुसे । तरी द्वारके उत्पात संभव कैसे । ये शंकेचें निरसिलें पिसें । व्यासऔरसें हरिइच्छे। कृष्ण स्वलीला इच्छामात्रे । चाली सर्वांचीं अंतरें । भूतें भौतिकें कृष्णतंत्रें । सत्तसूत्रें चेष्टती । तस्मात् कृष्णइच्छावशें । अक्रूर वाराणसी प्रवेशे। रामभामेची शंका निरसे । तदुद्देशें उत्पात । तेचि लक्षूनि उत्पात । द्वारकावासी जन तर्कित । प्राचीन ऋषीचें संमत । तेचि प्रस्तुत अवधारा ।
परिक्षितीने प्रश्न विचारला – मुनिवर्य! मग द्वारकेतील उत्पातांचे कारण तरी काय? त्यावर महामुनी शुकदेव म्हणाले – राजन्! ही हरिचीच इच्छा जाण. तोच सर्व सूत्रे हलवतो. त्याच्या इच्छेप्रमाणेच सर्व काही होत असते. तरीही काही ऋषींच्या संमतीने द्वारकावासी लोक काय तर्क करीत होते ते ऐक.
अक्रूर गेलियां उत्पात । जनमानसीं हा वितर्कहेत ।
प्रेरक सर्वग श्रीकृष्णनाथ । तो ऐका वृत्तान्त जनचर्चा ।
द्वारकावासी वृद्ध वृद्ध । मिळोनि वदती एवंविध ।
काशिप्रान्तीं अवृष्टिखेद । पूर्वी जनपद जैं पावे ।
तैं भूपाळ काशीश्वर । करितां वृष्टीचा विचार ।
श्वफल्क देखोनि पुण्यप्रचुर । स्वकन्या सुंदर या अर्पी ।
काशीश्वराची गान्दिनी कन्या । श्वफल्कें करितां निजाङना ।
परमानंद त्रिभुवना । अमृतघना सुर करिती ।
अमृतरूप जाली वृष्टि । परमानंदें धाली सृष्टि ।
ऐसी श्वफल्काची गोठी । सुत त्या पोटीं अक्रूर हा ।
यालागीं अक्रूर पुण्यशीळ । गांदिनीजठरिं श्वफल्कबाळ ।
याचा प्रभाव अमळ । तोही प्राञ्जळ अवधारा ।
पितरां ऐसाचि प्रभाव याचा । जेथ हा अक्रूर वसे साचा । तेथ वर्षाव पर्जन्याचा । आणि विघ्नाचा असंभव । चिंता हृद्रोग संताप । पीडा रोग न बधी अल्प । महामारी अरिष्टकल्प । नुपजे विकल्प कोण्हातें । ऐसे जनपद ठायीं ठायीं । वृद्ध मिळोनि वदती पाहीं ।
तेंचि श्रोत्यांचे श्रवणालयीं । रिघोनि हृदयीं प्रवेशे ।
देवदत्त परुळेकर